रविंद्र साळवे,
मोखाडा- भूकबळी ठरलेल्या ईश्वर सवरा आणि सागर वाघ यांना व त्यांच्या कुटुंबियांना रोज भूक भागविण्याची भ्रांत पडत होती. अनेकदा उपाशी पोटी रहावे लागत होते. असे भीषण वास्तव लोकमतने त्यांच्या घरी सात्वनासाठी भेट दिली असता. समोर आली आहे. घरात धान्यांचा कण नाही भांडी नाहीत अंथरूण, पांघरूण नाही, पुरेशी वस्त्रे नाही अशी स्थिती आहे.नामदेव सवरा म्हणाले की, रोज आम्ही उठतो ते आज पोटात दोन घास पडतील की नाही याच फिकीरीत कारण आमच्या हाताला रोजगार नाही. आधी तो शोधावा लागतो त्यात तो मिळाला तरी इतकी तुटपुंजी मजुरी मिळते की, त्यातून एक वेळी पोट कसे बसे भरावे असा प्रश्न असतो. आता सध्या हाताला कोणतेच कामे नाही. गवत कापणी करून काही दिवसांपासून आमचा उदरनिर्वाह सुरू आहे. तर आता कुणी गवत निंदणीचे कामे सांगतात हिच कामे करत आम्ही आमच्या मुलाबाळांना खाऊ घालत आहे ईश्वर गेल्याचे खूप दु:ख होत असून आता कृष्णा आणि सोनाली आणि पत्नी एवढाच आमचा परिवार उरला आहे. असे ते म्हणाले. ईश्वरची आई सुंदर हिने सागर गेल्या पासून अंगणवाडीत आहार दिला जात असल्याचे सांगितले. तोच आधी दिला गेला असता तर ईश्वर वाचला असता. कारण तो त्यापूर्वी कधी दिलाच जात नव्हता, असे सांगितले.यानंतर कळमवाडी येथील सागर वाघ या मृत बालकाच्या कुटुंबियांची परिस्थिती जाणून घेतली.त्याचे वडील शिवा म्हणाले की, आम्हाला घर नाही कुडाच्या झोपडीत आम्ही राहत आहोत. काम नसल्याने जगायच कसे हा आम्हला रोजच प्रश्न भेडसावतो. यामुळे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा शेतीचे कामे झाल्यानंतर आम्ही आमच्या मुलाबाळांसह स्थलांतरीत होतो. आम्हाला जॉबकार्डसुध्दा नव्हते, सागरचा मृत्यू झाल्यानंतर आम्हाला जॉबकार्ड दिले आहेत. सागर असतांना कधी कधीच अंगणवाडीतला आहार मिळायचा परंतु सागर गेल्याने या परिस्थितीत बदल झाला आहे. यामुळे सरकार आदिवासींचा जीव जाण्याची वाट पाहते काय असा प्रश्न उपस्थित केला.मुलगी नंदीती, पत्नी सीता असा आमचा परिवार आता उरला आहे, असे ते म्हणाले.मोखाडा ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ३०/३५ कुपोषित बालके दवाखान्यात दाखल झालेली आहेत, त्यांना एफ ७५, एफ १०० फूड दिले जात असून केळी अंडी दूध असा आहार दिला जात असून उपचार चालू असे लोकमतला सांगितले. त्यांच्या घरात कोणतीही चिज वस्तू नव्हती. अशी स्थितीत ते कसे जगत असतील असा प्रश्न कुणालाही पडावा अशी स्थिती होती. हे पाहून कोणाचेही हृदय द्रवेल असे वातावरण होते.