मुंबई - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कमरेला पिस्तूल लावून शालेय विद्यार्थ्यांसमोर भाषण केल्याच्या वृत्ताने सोमवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांची पाठराखण केली. प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करताच विरोधकांनी महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यावर इंदिरा गांधींचा खून ज्या पद्धतीने झाला ते पाहता मंत्र्यांनी असे पिस्तूल बाळगणे गैर नाही, असे शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी सांगताच तापत्या तव्यावर तेलच पडले. मंत्री सभागृहात नसताना असा मुद्दा उपस्थित करणे गैर आहे. ते सायंकाळी येतील तेव्हा बोलतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगून सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले. मंत्र्यांनी असे पिस्तूल कमरेला लावून फिरू नये, असे सांगून हा विषय संपविण्याचा प्रयत्न अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केला; मात्र त्यावर समाधान न झाल्याने विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासावर बहिष्कार टाकला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहात आलेल्या विरोधकांनी औचित्याच्या मुद्यावरुन पुन्हा हा विषय उपस्थित केला. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार यांनी सरकारवर टिकेची झोड उठवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन करावे लागले. ते म्हणाले, गिरीष महाजन यांच्याकडे २० वर्षापासून शस्त्र परवाना आहे. परवाना असेल तर शस्त्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. त्यात बेकायदेशिर काही नाही. मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनावर अजित पवार यांनी जोरदार हरकत घेतली. ते म्हणाले, सभागृहात अनेकांकडे परवाने असतील; पण मूकबधिर शाळेच्या मुलांसमोर पिस्तूल कमरेला लावून भाषण करणे हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनीही मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर नाराजी व्यक्त केली. त्यावर महाजनांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले.
पिस्तुलावरून गदारोळ
By admin | Updated: March 31, 2015 04:00 IST