मुंबई : पाच आणि तीन वर्षांच्या विधि अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला अखेर दोन महिन्यानंतर मुहूर्त मिळाला आहे. सोमवारी प्रवेशाची पहिली यादी लागल्यानंतर पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ४ हजार १२१, तर तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ८ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी मंगळवारी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसरी यादी २० सप्टेंबरला जाहीर होईल.प्रशासनाने ३ ते ११ सप्टेंबरदरम्यान पसंतीक्रम अर्ज भरण्याची संधी दिली होती. सोमवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. राज्यात उपलब्ध असलेल्या एकूण १५ हजार २४० जागांसाठी १६ हजार ८७३ अर्ज आले होते. त्यात १० हजार ८२१ विद्यार्थी असून, ६ हजार ०५२ विद्यार्थिनी आहेत. शिवाय पाच वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी १० हजार १८० जागा उपलब्ध असून, त्यातील २ हजार ३०० जागा अनुदानित, ५०० जागा विनाअनुदानित आणि ७ हजार ३८० जागा सेल्फ फायनान्स व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील आहेत. या जागांसाठी केवळ ६ हजार ४६५ अर्ज आले असून, त्यात ३ हजार ३४९ विद्यार्थी व ३ हजार ११६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे, तर दुसरी यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. तरी प्रवेश निश्चित न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर केले जाईल, असे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)
विधि प्रवेशाची दुसरी यादी २० सप्टेंबरला
By admin | Updated: September 14, 2016 06:08 IST