पुणे - ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला मिळाला. साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाली. साताऱ्यात होणारे हे चौथे संमेलन ठरणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष गुरूय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या संमेलनासाठी औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर आणि सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती.
साताऱ्यात पहिल्यांदा १९०५ साली संमेलन तिसरे संमेलन १९०५ साली साताऱ्यात झाले होते. त्यानंतर १९६२ मध्ये ४४ वे, तर १९९३ साली ६६ वे संमेलन झाले होते. यंदाचे हे चौथे संमेलन असेल.
३२ वर्षांनंतर पुनश्च शाहू स्टेडियमवरच संमेलन साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर यापूर्वी १९९३ साली ६६ वे संमेलन झाले होते. आता ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा याच स्टेडियमवर संमेलनाचे आयोजन होण्याचा योग जुळून आला आहे. हे स्टेडियम १४ एकरमध्ये आहे.
मार्गदर्शन समिती गठित संमेलनाच्या मार्गदर्शन समितीमध्ये प्रा. मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे.
साताऱ्याला ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. गेल्या १२ वर्षांपासून मसापची शाहूपुरी शाखा संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी, यासाठी पाठपुरावा करत होती.- प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ