खानापूर (जि़सांगली) : बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी तीन तरुणांनी हिवरे येथील एका कुटुंबावर हल्ला करून माय-लेकीचा खून केला. रविवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. प्रभावती शिंदे (५५) व सुनीता पाटील (३५) ही मृत माय-लेकींची नावे आहेत़ प्रभावती यांची सून निशिगंधा शिंदे (२८) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हल्लेखोरांचे टार्गेट असलेले कुटुंब आधीच दुसरीकडे राहण्यास गेल्याने ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता अशा निष्पाप महिलांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आह़े पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सुधीर सदाशिव घोरपडे (२४), रवींद्र्र रामचंद्र कदम (२०) व अजित रवींद्र्र पाटील (१८) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. शिंदे कुटुंब पळशी गावाच्या शिवेलगत राहते. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तीन तरुण आले आणि त्यांनी धारदार शस्त्राने प्रभावती, सुनीता व निशिगंधा यांचे गळे कापले. यात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर निशिगंधा या गंभीर जखमी झाल्या़ निशिगंधा यांना तात्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी जरंडी पत्र्यानजीक संशयित सुधीर घोरपडेलालोकांनी पकडल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी नंतर त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अन्य दोन संशयितांची माहिती मिळाल्याने रवींद्र कदम व अजित पाटील यांना विटा व तासगाव येथून ताब्यात घेतले. बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी चुकून दुसऱ्याच कुटुंबावर हल्ला झाल्याचे पोलीस सांगत असले तरी, यामागे आणखी काही कारण आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे. (वार्ताहर)
सांगलीत माय-लेकीची निर्घृण हत्या
By admin | Updated: June 22, 2015 02:33 IST