मुंबई : अपहरणकर्त्यांपासून सुटका करत चेन्नईत राहणाऱ्या आणि दहावीत शिकणाऱ्या तीन मुलींनी थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर मुंबई मध्य रेल्वे सुरक्षा दलाने चेन्नई पोलीस आणि मुलींच्या नातेवाइकाशी संपर्क साधून सगळी घटना समोर आणली. या प्रकरणाची अधिक चौकशी मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) करतानाच चेन्नई पोलीसही अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले. मुलींचे नातेवाईक मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चेन्नईत राहणाऱ्या १५ वर्षे वयाच्या तीन मुली दहावीत शिकतात. सोमवारी या तिघी शाळेत जाण्यासाठी मनीपुट्टोर या बसस्टॉपवर बसची वाट पाहत होत्या. तेव्हा एका व्हॅनमधील इसमाने मुलींना पत्ता विचारला. पत्ता सांगत असतानाच त्यांना गाडीत खेचण्यात आले व व्हॅन सुरू केली. व्हॅन सुरू झाल्यानंतर अन्य एका इसमाशी त्या तिघींची झटापट झाली. ही झटापट होत असतानाच चेन्नईतील टी-नगर जंक्शनजवळ संधी साधत त्या तिघीही गाडीतून उतरल्या; त्यांनी समोरच असलेले सेंट्रल चेन्नई स्थानक गाठले आणि जीव वाचविण्यासाठी एक्स्प्रेसमध्ये चढल्या. मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ट्रेन सीएसटी स्टेशनवर आली असता त्यांना घाबरलेल्या अवस्थेत बघून एका महिला प्रवाशाने त्यांचाकडे विचारणा केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. सदर महिलेने तत्काळ सीएसटी स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) याची माहिती दिली आणि या तिघींनाही रेल सुरक्षा दलाने आपल्या ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)चेन्नईतील मुली असल्याने त्यांना संवाद साधता येत नव्हता. हिंदी भाषा येत नसल्याने रेल्वे पोलिसांनाही त्यांच्याशी संवाद साधता येत नव्हता. ज्या महिलेने तिघींना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले ती महिला निघून गेल्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रश्न रेल्वे पोलिसांसमोर उभा राहिला. यानंतर सीएसटी स्थानकातच कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि तामिळ अवगत असणाऱ्या दोन महिलांना रेल्वे पोलिसांनी बोलावले व त्यांच्यामार्फत संवाद साधला. त्या वेळी बरीच माहिती समोर आली. यानंतर मध्य रेल्वे पोलिसांनी तत्काळ त्यांच्या पालकांशी आणि पोलिसांशी संपर्क साधला.मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) चौकशी करतानाच चेन्नई पोलीसही अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. मुलींचे नातेवाईक मुंबईत दाखल झाल्यानंतर मुलींना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या तीन मुली १५ वर्षांच्या आहेत. चेन्नईत त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. मुली बेपत्ता असल्याची तक्रारही चेन्नईत दाखल झाली आहे. मुलींच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना सर्व कल्पना देण्यात आली. यासंदर्भात चेन्नईतील पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे. - अजय यादव (सीएसटी रेल्वे सुरक्षा दल-वरिष्ठ निरीक्षक)
अपहरणकर्त्यांपासून केली सुटका
By admin | Updated: June 29, 2016 04:23 IST