रत्नागिरी - मराठा समाजातील कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणवून घेत नाही. आम्हाला कुणबी मराठा आरक्षण नको आहे, असे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. अखिल भारतीय मराठा फेडरेशनच्या अधिवेशनासाठी ते रत्नागिरीमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत पुन्हा एकदा तेवढ्याच ठामपणे मांडले.
घटनेच्या 15 आणि 16 (4) या कलमांमध्ये जी तरतूद आहे त्यानुसार सर्वेक्षण करून त्या समाजात मागासलेपणा आढळल्यास आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यानुसार राज्य सरकारने मराठा समाजाला हे आरक्षण द्यावे, असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात 30 टक्के मराठा समाज आहे. मात्र आज इतक्या वर्षानंतरही या समाजाची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचा वाटा कमी आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय करून मराठा समाजाने आपली प्रगती साधावी, असेही आपले ठाम मत आहे, असे ते म्हणाले.