मुंबई : राज्यपालांच्या वतीने नियुक्त केल्या जाणार्या विधान परिषदेच्या १२ जागांसाठी काँग्रेसतर्फे ११ नावे पुढे आली आहेत, तर राष्टÑवादीने त्यांच्या कोट्यातील सहा नावांची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे. दोन्ही काँग्रेस सहा-सहा जागा घेत आल्या आहेत. राज्याच्या राजकारणात यापुढे आपण १६ ते १८ तास देणार, असे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी स्वत: तयार करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही नावे गुलदस्त्यात आहेत. काँग्रेसमध्ये नेते तेवढ्या शिफारशी असे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी सातार्याचे आनंदराव पाटील व धुळ्याचे रोहिदास पाटील यांच्या नावांची शिफारस केली तर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी बुलडाण्याचे गणेश पाटील व लातूरचे बसवराज पाटील-नागराळकर यांची, अशोक चव्हाण यांनी बीडचे टी.पी. मुंडे व जळगावच्या ललिता पाटील यांची, नारायण राणे यांनी ठाण्याचे रवींद्र फाटक तर गुरुदास कामत यांनी अमरजितसिंह मनहार व निर्मला सामंत-प्रभावळकर यांची नावे सुचवली. अल्पसंख्याक सेलने नागपूरचे अनिस अहमद व एस.क्यू. जामा यांच्या नावांची शिफारस केली. राज्यपाल नियुक्त सदस्यांना मंत्रिपद देऊ नये, असा संकेतही राष्ट्रवादीने पाळला नाही. त्यांनी फौजिया खान यांना राज्यमंत्रीपद दिले होते. मुळात राज्यपाल नियुक्त सदस्य हे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग अशा क्षेत्रांतील जाणकार असावेत, असा संकेत होता.
विधान परिषदेवरू न रस्सीखेच
By admin | Updated: May 29, 2014 03:09 IST