अकोला : उताराला आडवी पेरणी केल्यामुळे उत्पन्नात भर तर पडतेच शिवाय पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरू न पुनर्भरणास मदत होत आहे. तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकर्यांनी साडेचार हजार हेक्टरवर एका वर्षात ३६०० कोटी लीटर पडलेल्या पावसाचे पाणी अडवून जिरविण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. राज्यातील शेतकर्यांनी या पद्धतीने उताराला आडवी पेरणी केल्यास शेती उत्पादन वाढीसह जमिनीत जलपुनर्भरणास मदत होणार आहे. तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी गावातील शेतकर्यांच्या उतारपाटी असलेल्या शेतीतील रंग भुरकट व मुरमाड झाला आहे. भविष्यातील धोका ओळखून संवर्ग विकास समितीने या भागात सेंद्रिय शेतीशाळा सुरू केल्या आहेत. आदिवासी गावातील शेतकर्यांना उताराला आडवी पेरणीसाठी प्रवृत्त केले. आता या प्रयत्नाला यश येऊ लागले असून, मागील वर्षी १८ गावांमधून साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी केली. त्याचा फायदा तेव्हाच दिसून आल्यामुळे, यावर्षीसुद्धा आदिवासी भागात उताराला आडवी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
*बिनखर्चाचे तंत्रज्ञान
आदिवासी गावातील शेतकर्यांनी विनाखर्च या तंत्रज्ञानातून साडेचार हजार हेक्टर्स क्षेत्रावर एका वर्षात ३६०० कोटीलीटर पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत जिरवले आहे. सिंचन विभागाच्या अंदाजानुसार ६.१३ दशलक्ष घन मीटर पाणी साठविण्यासाठी साधारणत: ३८ कोटी रुपये खर्चून धरण बांधावे लागले असते. या प्रयोगातून शेतातील माती वाहून जाण्याचे थांबले.