अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- पाहिल्याच पावसाने प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. नरपड, चिखले आणि घोलवड या ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. पावसाळया पूर्वी गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यालगत गटारांची सोय, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक होते. मात्र या तिनही ग्रामपंचायतीने याबाबत योग्य नियोजन न केल्याने ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नरपड ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी गेल्या तीन महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यामुळे पावसाळयापूर्वी करावायची कामे झालेली नाहीत. दरवर्षी प्रमाणे पावसाळयापूर्वी गटार व्यवस्था न केल्याने रस्त्यावर पाणी साचणे तसेच घरांमध्ये पाणी घुसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. चिखले ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील संवाद आणि सामंजस्याच्या अभावामुळे ग्रामविकासाला खीळ बसली आहे. रस्त्याच्या दुतर्फा आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्र मण करून बांधकामे उभी राहिली आहेत. >काय आहे सध्याची नेमकी परिस्थिती?गटारे खोदण्याची परंपरा गटातटाच्या राजकारणामुळे खंडीत होवून, पावसाचे पाणी निचरा होण्यात अडचणी येत आहेत. उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावलेली नाही. राजकीय लागेबांधे जपण्यामुळे निकृष्ट कामे झाल्याने रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य व तळी साचली आहेत. घोलवड गावातील मुख्य रस्तावरील मोरीच्या दोन्ही बाजूला पाणी साचल्याने मार्गक्र मण करणे कठीण बनले आहे. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने दुर्गंधी, डासांचा वाढता उच्छाद आणि आजाराची साथ पसरण्याची भीती गामस्थांना सतावते आहे.