मुंबई : महिनाभरापासून चातकासारखी ज्याची प्रतीक्षा होती त्या पावसाने अखेर मुंबई शहर, उपनगरे आणि राज्यातील काही भागांमध्ये ‘वापसी’ केली. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेली संततधार अनेक ठिकाणी मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होती. तलाव क्षेत्रात झालेल्या पावसाने २४ तासांत ११ दिवसांचा मुंबईसाठीचा जलसाठा वाढला आहे़ ऐन पावसाळ्यात घामाघूम करणाऱ्या वातावरणातून पावसाने मुंबईकरांची सुटका केली, मात्र दुसरीकडे पाणी तुंबल्याने हालही तसेच केले. लाइफलाइन समजली जाणाऱ्या लोकलचे तिन्ही मार्ग सकाळी काही काळ ठप्प झाले. तसेच नाले तुंबल्याने पाणी रस्त्यांवर आले आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पालघर जिल्ह्यात बापलेक वाहून गेले, तर गोवंडीमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. मुंबईला दररोज ३,७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ त्यानुसार तलावांमध्ये ८४ दिवसांचेच पाणी शिल्लक होते़ त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट घोंघावू लागले होते. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्याच कपातीचा निर्णय होऊ घातला होता. मात्र तलाव क्षेत्रात पावसाने पुनरागमन करीत सुखद धक्का दिला आहे़
पाऊस वापसी!
By admin | Updated: July 22, 2015 01:52 IST