शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

शेतकऱ्यांच्या निषेधाने सरकारच्या कानाचे पडदे फाटले का? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 6, 2017 07:45 IST

सलग पाच दिवस सुरू असलेल्या शेतक-यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - संपकरी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण, सलग पाच दिवस सुरू असलेल्या शेतक-यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित केला आहे. 
 
तसंच शेतक-यांच्या संपामध्ये शिवसेना पाठिशी आहे, याचा देखील पुर्नउल्लेख त्यांनी संपादकीयमधून केला आहे. 
शिवाय, शेवटची मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू ठेवावाच लागेल, अशा इशाराही उद्धव यांनी दिला आहे.  
 
काय आहे सामना संपादकीय?
राज्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला अपेक्षेप्रमाणेच प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी निदर्शने, रास्ता रोको, प्रतीकात्मक अंत्ययात्रा, पुतळ्यांचे दहन, सरकारच्या निषेधार्थ मुंडण, ‘जोडे मारा’ आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून झाला. मात्र हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या एकजुटीने फोल ठरवला आहे. सोमवारी याच वज्रमुठीचे तडाखे महाराष्ट्रात ठिकठिकाणी बसले. बहुतेक सर्वच जिल्ह्यांतील प्रमुख बाजारपेठा, बाजार समित्या पाचव्या दिवशीही ओस पडलेल्या होत्या. नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, धाराशीव, लातूर, पुणे, धुळे, नंदूरबार आदी सर्वच जिल्हय़ांमध्ये ‘बंद’ कडकडीत आणि शंभर टक्के यशस्वी झाला. अनेक ठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम वगैरे झाल्याने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. नाशिकमधील शेतकऱ्यांनी बैलगाड्या आणून रस्ता रोखला, तर पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी मालगाडी रोखून निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या संतापाचा हा उद्रेक सलग पाचव्या दिवशी महाराष्ट्राने पाहिला. अर्थात राज्य सरकारने तो पाहिला का? शेतकऱ्यांच्या निषेधाने सरकारच्या कानाचे पडदे फाटले का? बळीराजाच्या या संतापाची धग राज्यकर्त्यांना जाणवली का? 
 
असे अनेक प्रश्न तूर्त अनुत्तरितच आहेत. सरकारकडून या प्रश्नांची उत्तरे जेवढ्या लवकर कृतीतून दिली जातील तेवढी ती सर्वांच्याच हिताची आहेत. शेतकरी संप आणि सोमवारचा ‘कडकडीत बंद’ ही बळीराजाच्या मनातील खदखद आहे. काही ठिकाणी भलेही जाळपोळ, तोडफोड, बाचाबाची अशा घटना घडल्या असतील, पण त्याकडे सरकार आणि समाजानेही ‘आंदोलनाला हिंसक वळण’ या नेहमीच्या चष्म्यातून पाहू नये. या घटनांना हिंसाचार न मानता त्याकडे बळीराजाच्या संतापाचा उद्रेक म्हणून पाहायला हवे. शेतकऱ्याच्या पोटात खदखदणारा भुकेचा लाव्हाच जणू या आंदोलनाच्या माध्यमातून उफाळून आला आहे. सामान्य शेतकऱ्याची ही भूक समजून घेतली पाहिजे. प. महाराष्ट्रातील शेतकरी मुंडण करतो, मराठवाड्यातील शेतकरी अर्धनग्न अवस्थेत तहसीलदारांना निवेदन देतो. सोलापूर जिल्हय़ात पाण्याच्या टाकीवर चढून शेतकरी ‘शोले’ स्टाइल आंदोलन करतो. हे शेतकऱ्यांचे ‘स्टंट’ नाहीत; ती त्यांची व्यथा आहे. आता तरी ती समजून घेतली जाणार आहे की नाही? मात्र त्याऐवजी नाशिकमधील आंदोलनाचा भडका पाहून तेथील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. प्रशासनाला नाशिक हे अशांत कश्मीर आणि आंदोलनकर्ते शेतकरी म्हणजे जवानांवर दगडफेक करणारे देशद्रोही नागरिक वाटले का? शेतकरी आंदोलनाचा भडका उडालेला असताना आगीत तेल ओतणारे हे प्रकार कशासाठी? ते थांबवा, नाहीतर शेतकरी
 
आंदोलनाचा भडकलेला ‘शोले’
 
कशाकशाची राखरांगोळी करेल हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांचा संप आणि प्रचंड यशस्वी झालेला ‘महाराष्ट्र बंद’ हा बळीराजाच्या पेटलेला वेदनेचा एल्गार आहे. सरकार, समाज आणि सोशल मीडियावरून या आंदोलनाची ‘थट्टा’ उडविणारे, त्याला ‘आरोपीच्या पिंजऱ्या’त उभे करणारे अशा सर्वांनीच या संतापामागील वेदना समजून घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या जवळ जवळ सर्वच भागातील शेतकरी या संपात सहभागी झाले आहेत. शिवसेनेनेही या संपाला संपूर्ण पाठिंबा दिलाच आहे. या साऱयांचा एकत्रित परिणाम म्हणूनच शेतकऱ्यांच्या ऐक्याची वज्रमूठ आणि तिचे तडाखे प्रस्थापितांना बसत आहेत. ऐक्याची ही वज्रमूठ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमीभाव दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या पेटलेल्या वेदनांवर आता आश्वासनांची फुंकर उपयोगाची नाही हाच सोमवारच्या ‘कडकडीत बंद’ने राज्यकर्त्यांना दिलेला इशारा आहे. त्यापासून योग्य धडा घेतला नाहीतर आज उफाळून आलेला शेतकरी वेदनेचा लाव्हा उद्या भयंकर उत्पात घडविल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही आजच देऊन ठेवत आहोत. शेतकऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’ प्रचंड यशस्वी झाला. मात्र ही लढाईची सुरुवात आहे. ती पुढेही सुरूच राहील. शेवटची मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू ठेवावाच लागेल. शिवसेना पूर्वीही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती, आजही आहे आणि उद्याही राहीलच.