लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पूररेषेच्या आत अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठीचे सर्व्हेक्षण करताना अचूकतेसाठी उपग्रहाद्वारे मॅपिंग करावे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका बैठकीत दिले.
सह्याद्री अतिथीगृहात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आदी उपस्थित होते. कोकण भूमिगत वीज वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, दरडप्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर भर द्यावा असे मुख्यमंत्री म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापनाचे काम दर्जेदार करण्याचे निर्देश
- आपत्ती व्यवस्थापनात दर्जेदार काम करावे, पावसानंतर नुकसान झालेले रस्ते, बंधारे, वीज वाहिन्या दुरुस्ती कामासाठीसुद्धा या निधीचा उपयोग करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
- आपत्तींचा सर्वंकष अभ्यास करून त्यानुसार त्या त्या भागातील ग्रामपंचायतींना आपत्ती व्यवस्थापनाचे किट द्यावे, नदी स्वच्छ करून नदीतील गाळ काढणे, या कामांना जलसंपदा विभागाने प्राधान्य द्यावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
- ग्रामपंचायतींना आपत्ती व्यवस्थापन किट देत असताना आवश्यक मनुष्यबळाचे प्रशिक्षणही देण्यात यावे. किटमधील साहित्याचा अपघाताच्या वेळी मदत कार्यात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतींना किट देण्याबाबत कार्यवाही व्हावी, असे मंत्री महाजन यावेळी म्हणाले.