पुणे : सुमारे दोन महिने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सकारात्मक दखल प्रथमच केंद्रीय पातळीवर घेतली गेल्याने फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) चिघळलेला वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्प मूल्यांकन प्रक्रियेसह अन्य विषयांवर विस्तृत चर्चा केल्याने या वादात तोडगा निघेल, अशी आशा संचालक, विद्यार्थी यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. त्रिदस्यिय समिती आपला अहवाल सोमवारपर्यंत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे सादर करणार आहे. एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली त्या दिवसांपासूनच विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले. संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांना घेराव घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवारी पाच आंदोलक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. तरीही विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला.या पार्श्वभूमीवर आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने एस. एम. खान, अंशू सिन्हा आणि सी. राजनाथ यांची समिती शुक्रवारी संस्थेत आली. या समितीने केवळ स्टूडंट असोसिएशनशीच नव्हे तर टिचर्स आणि कर्मचारी वर्गाशीही चर्चा केली.
एफटीआयआयमधील वाद मिटण्याची शक्यता
By admin | Updated: August 22, 2015 00:52 IST