बारामती : राजकीय प्रश्न असतील, तेव्हा ज्याच्या-त्याच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे काम करावे. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्रित शक्ती पणाला लावली, तर समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. भाजपाच्या नेतृत्वाने गरीब समाजातील अमर साबळे या व्यक्तीला त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे देशाच्या वरिष्ठ सभागृहाचे खासदार केले. याच संधीचे सोने त्यांनी करावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.भाजपाचे राज्यसभेतील नवनियुक्त खासदार अमर साबळे यांचा बारामतीकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, भटके विमुक्त जाती-जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते, आमदार दत्तात्रय भरणे, राजेंद्र पवार, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, सभापती करण खलाटे, समितीचे समन्वयक अॅड. सुभाष ढोले, दिलीप शिंदे, अविनाश रणसिंग, संजय संघवी, संभाजी होळकर, अविनाश मोटे, विश्वासराव देवकाते आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘बारामतीकरांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे. अमर साबळे यांच्या रूपाने नववा खासदार मिळाला. बारामतीच्या आमराई विभागातून ३ खासदार देशाच्या सर्वोच्च संसदेचे प्रतिनिधत्व करतात.’’साबळे यांनी त्यांच्या भाषणात बारामतीला रेल्वेमार्गाने देशाला जोडण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावर पवार म्हणाले, ‘‘सुरुवातीला बारामती-फलटण रेल्वेमार्ग बागायती भागातून जाणार होता. त्याला बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर जिरायती भागातून हा मार्ग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तो खर्चीक आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. तरीदेखील खऱ्या अर्थाने देशाच्या दक्षिणोत्तर भागाला बारामतीला जोडण्यासाठी हा मार्ग पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.’’या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘‘राजकीय जीवनात यश-अपयश येत असते; परंतु त्यासाठी भूमिका बदलणे चुकीचे ठरते.’’ भटक्या विमुक्त जाती-जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते म्हणाले, ‘‘दलित चळवळीतील कार्यकर्ता चिंतनशील आहे. आंबेडकरी विचाराची जुळणी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना दिलेली संधी खरोखरच महत्त्वाची आहे.’’सत्काराला उत्तर देताना साबळे म्हणाले, ‘‘बारामतीच्या विकासात खासदारकीच्या माध्यमातून शक्य होईल तेवढे काम केले जाईल. खासदारकी मिरवण्यासाठी नाही, तर या देशाच्या वैभवासाठी झटण्याचे दायित्व देण्यासाठी आहे. बारामतीकरांनी मोठ्या मनाने आपला नागरी सत्कार केला. त्या ऋणात राहणेच मी पसंत करीन.’’संयोजक नगरसेवक सुभाष ढोले यांनी प्रास्ताविक केले. भारत गावडे पाटील यांनी आभार मानले. दिलीप शिंदे, अविनाश मोटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
विकासाच्या मुद्द्यावर राजकारण नकोे
By admin | Updated: June 5, 2015 23:46 IST