ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ - राजकीय कार्यक्रमांमध्ये शक्तीप्रदर्शन करताना व्यासपीठावरील नेत्यांकडून तलवार उंचावण्याच्या प्रकारावर न्यायालयाने आक्षेप घेतल्याने आता ही तलवार लवकरच म्यान होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद खंडपीठाने या प्रकाराबात आक्षेप नोंदवत केंद्र सरकारला याविष्यी शपथपत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी नगरमधील एका कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तलवार भेट दिली होती. मोदींनी शिरस्त्याप्रमाणे म्यानातून ती तलवार बाहेर काढत सर्वांसमोर उंचावली. मात्र या सर्व प्रकाराविरोधात कोपरगावच्या दोन जणांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.
राजकीय कार्यक्रम व तलवार उंचावून दाखवणे यात काहीही संबंध नसल्याने अशा कार्यक्रमांदरम्यान तलवारबाजी का केली जाते असा सवाल विचारत न्यायालयाने या प्रथेवर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे यापुढे राजकीय कार्यक्रमातील तलवारबाजीवर बंदी येणार असेच दिसत आहे.