अंबुलगा (जि. लातूर) : मुलाच्या किडनीच्या आॅपरेशनसाठी विक्रीला काढलेली जमीन नोटाबंदीमुळे कोणीही घेत नसल्याचा दावा करत जमीन शासनानेच खरेदी करून पैसे द्यावेत, अशी विनंती एका पित्याने थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून केली आहे़ निलंगा तालुक्यातील हाडगा येथील अल्पभूधारक शेतकरी माधव नरवटे यांचा २६ वर्षीय मुलगा ज्ञानेश्वर याच्या गेल्यावर्षी अचानक दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यामुळे दोन एकर शेतीसह रोजंदारीवर चालणाऱ्या या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले. पाहुणे व मित्रपरिवाराच्या मदतीने आतापर्यंत त्यांनी उपचार केले. मात्र किडनी प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे औरंगाबाद येथील डॉक्टरांनी सांगितले़ तेव्हा ज्ञानेश्वरच्या आईने किडनी देण्याचा निर्णय घेतला़ मात्र आॅपरेशनसाठी जवळपास सात लाख रुपये खर्च येणार असल्याने माधवराव यांनी एक एकर जमीन विकण्यास काढली़ परंतु, नोटाबंदीमुळे कोणीही ाकडेही मोठी रक्कम शिल्लक राहिली नाही़ त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एकही व्यक्ती खरेदीसाठी पुढे आली नाही, असे नरवटे यांचे म्हणणे आहे. ज्ञानेश्वरची प्रकृती खालावत चालल्याने शेवटी माधवराव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली जमीन शासनानेच विकत घ्यावी व मुलाच्या आॅपरेशनसाठी पैसे द्यावेत, अशी आर्त हाक दिली आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्याचे पंतप्रधानांना पत्र!
By admin | Updated: January 18, 2017 06:25 IST