सदाशिव पेठ : निनाद संस्थेतर्फे श्रद्धांजली अर्पणपुणे : सन १७६९... माधवराव पेशवे यांनी अप्पाजी मुंडे यांना पेठ वसविण्याचे आदेश दिले, मुंडे यांनी पेशव्यांचा आदेश पाळत एक पेठ वसविली, तिच ही सदाशिव पेठ. ज्या अप्पाजी मुंडे यांनी पेठ वसविली, ते केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पूर्वज. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारा नेता आपल्यामध्ये नाही, हे कळल्यावर मुंडे यांच्या पूर्वजांनी वसविलेली ही सदाशिव पेठही आज गहिरवली.निनाद संस्थेतर्फे भाजपाचे माजी नगरसेवक उदय जोशी यांनी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरीता सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर चौकामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ दादासाहेब बेंद्रे, माजी खासदार प्रदीप रावत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगराचे किशोर शशितल, ब्राह्मण संघाचे प्रकाश दाते, निनाद संस्थेचे अनिल गानू, अशोक कुलकर्णी, शुभदा जोशी, अनुप जोशी आदी उपस्थित होते. रंगावलीकार सुनील सोनटक्के यांनी रेखाटलेल्या रंगावलीवर पणत्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.बेंद्रे म्हणाले, आणीबाणीच्या काळात माझा आणि मुंडे यांचा संबंध आला. आयएलएस लॉ कॉलेजमध्ये मुंडे शिकायला असताना मी प्राध्यापक होतो. त्यावेळी चळवळीत सहभाग घेणा-या मुंडे यांचे जीवन महाविद्यालयीन काळापासून बदलत गेले. पुढे ते आमदार, खासदार जरी झाले, तरी त्यांची सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ कधीही तुटली नाही. रावत म्हणाले, पुणे ही गोपीनाथ मुंडे यांना घडविणारी कर्मभूमी आहे. अन्यायाविरोधात लढणे आणि पक्ष-संघटनेचे काम तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.
मुंडेंच्या पूर्वजांनी वसविलेली पेठही गहिवरली
By admin | Updated: June 4, 2014 22:26 IST