काळेवाडी : शहरातील मध्यवर्ती स्टेशन म्हणून पिंपरी स्टेशनची गणना होत असली तरी हे स्टेशन नियोजनाअभावी अस्वच्छता व असुविधांच्या गर्तेने पिंपरी स्टेशनला व्यापलेले आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून फूटपाथ व इतर दुरुस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, अद्यापही ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत्त आहे.या स्थानकावर प्रवाशांसाठी बांधलेल्या स्वच्छ्तागृहाची अवस्था अतिशय गलिच्छ असून त्याची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे इमर्जन्सी म्हणूनही त्याकडे डोकावण्यास कोणत्याही प्रवाशांना इच्छा होत नाही. तसेच या स्टेशनवर दारु पिऊन भटकत फिरणारे टवाळखोर व भिकारी यांची हक्काची जागा म्हणून ते या स्टेशनवर मोकाट फिरत असतात. त्यामुळे विद्यार्थिनी व स्त्रियांना या टवाळखोरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक वेळा रेल्वे रुळावरील ओव्हरब्रिजवर काही आंबटशौकीन तरुण व तरुणी दंगामस्ती करताना दिसून येत आहेत. >भुरट्या चोरांचा उपद्रवया स्टेशनच्या परिसरात जवळच पिंपरीतील बाजारपेठ व भाजी मंडई असल्यामुळे या स्टेशनवर नेहमीच स्त्री-पुरुष प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. या गर्दीचाच फायदा घेण्यासाठी पाकीट मारणाऱ्या भुरट्या चोरांचाही उपद्रव अनेकवेळा प्रवाशांना सहन करावा लागत आहे. स्टेशनच्या बाजूलाच झोपडपट्टी असल्यामुळे रात्रीच्या वेळी बाजूने दगड मारण्याचे प्रकार घडत असल्यामुळे येथील रेल्वे पोलीसही या टवाळखोरांना हटकण्याचे धाडस करण्यास धजावत नाहीत. या स्टेशनवर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर नेहमीच अनधिकृत रिक्षा, हातगाड्या व दुचाकी पार्क केलेल्या असतात.>प्रवेशद्वारावर अतिक्रमणनागरिकांच्या सोयीस्कर असणाऱ्या रस्त्यावर लोखंडी जाळ्या लावलेल्या असल्यामुळे दूध,भाजीवाले व अनेक प्रवासी घाई-गडबडीने धोकादायक पद्धतीने लोखंडी जाळीवर चढून जवळचा मार्ग स्वीकारत असतात. तसेच अनेकजण जीव धोक्यात घालून रेल्वे रूळही ओलांडत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यताही दाट असते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येनुसार व वाढणाऱ्या गर्दीनुसार लोकल गाड्यांची संख्याही वाढली पाहिजे. तसेच स्टेशनवरील सोई-सुविधा सुधारून स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे अशी सर्व प्रवासी वर्गांचीही मागणी आहे. >स्वच्छतागृहाची देखभाल नाहीपिंपरी रेल्वे स्थानक हे पिंपरी-चिंचवड शहरासाठी मध्यवर्ती स्थानक आहे. येथून मुंबई, लोणावळा, पुणे या भागात जाण्यासाठी कामगारवर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील असते. मात्र या स्थानकावरील स्वच्छतागृहाची देखभाल केली जात नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. शिवाय स्थानकावर भिकारी, गर्दुले व टवाळखोरांची वर्दळ असते. त्यामुळे महिला प्रवाशांना असुरक्षित वाटत असते. पोलिसांकडून यांवर कारवाई करण्यास कुचराई केली जात असते.
अस्वच्छतेने प्रवासी होताहेत त्रस्त
By admin | Updated: January 16, 2017 01:52 IST