मिरज (जि़ सांगली) : रेल्वे अर्थसंकल्पात कराड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गासाठी व पुणे-मिरज-लोंढा या मार्गाच्या विद्युतीकरण, दुहेरीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. नवीन रेल्वेगाड्या, प्रवासी सुविधा, दुष्काळी भागातून जाणाऱ्या नवीन रेल्वेमार्गासाठी अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नसल्याने रेल्वेमंत्र्यांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रेल्वे अंदाजपत्रकात लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी व विद्युतीकरणासाठी ४ हजार ६७० कोटींची तरतूद व कराड-चिपळूण नवीन रेल्वेमार्गासाठी १२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातून जाणाऱ्या नवीन रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद नाही. मिरज-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या मोठी आहे. या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यामुळे मिरजेतून पुणे, मुंबई प्रवास जलद व सोयीचा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले होते. मात्र अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या वर्षी रेल्वे अंदाजपत्रकात लोंढा-मिरज-पुणे रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४ हजार ६७० कोटी रुपये आर्थिक तरतुदीची घोषणा दिलासा देणारी आहे.
प. महाराष्ट्राचा अपेक्षाभंग
By admin | Updated: February 27, 2015 02:36 IST