शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

जिल्हा परिषदांमध्ये अन्य पक्ष नगण्यच!

By admin | Updated: February 14, 2017 00:59 IST

महाराष्ट्राचे राजकारण अलीकडच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी व्यापून

महाराष्ट्राचे राजकारण अलीकडच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी व्यापून टाकले आहे. एके काळी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राज्यभर दबदबा असणारा शेतकरी कामगार पक्ष केवळ रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका घेऊ शकतो. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जनसुराज्य पक्ष या दोनच पक्षांची नोंद घेण्याजोगी ताकद आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या लढत आहेत, पण एकाही जिल्ह्यात बहुमताने सत्तेवर येईल, अशी इतर पक्षांची परिस्थिती नाही.गत निवडणुकीतील पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालावर नजर टाकली, तर असे दिसते की, ६३ अपक्ष सदस्यांसह अनेक पक्षांनी एकूण १८८ जागा जिंकल्या होत्या. अपक्षांनी जिंकलेल्या जागा सर्वाधिक गडचिरोलीत (सदस्य संख्या १०) होत्या. सहा जिल्हा परिषदांमध्ये एकही अपक्ष निवडून आला नव्हता. उर्वरित ठिकाणी दोन-चार अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. राज्यातील अन्य पक्षांनी विजय नोंदविला होता. त्यामध्ये (कंसात त्यांनी जिंकलेल्या जागा) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (१७), शेतकरी कामगार पक्ष (२३), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (१), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (५), बहुजन समाज पक्ष (३), स्वाभिमानी शेतकरी संघटना (६), जनसुराज्य शक्ती पक्ष (६), शिवसंग्राम (१), लोकभारती (७) अशी संख्या आहे. काही स्थानिक आघाड्या किंवा संघटना होत्या. त्यांनी ठिकठिकाणी काही जागा पटकावल्या होत्या. चंद्रपूरमध्ये युवाशक्ती संघटनेने (५), साताऱ्यात पाटण विकास आघाडी (३), चंद्रपुरात शेतकरी संघटना (२), सोलापुरात स्थानिक आघाड्या (१२) अशांचा समावेश आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वांत चांगले यश औरंगाबादमध्ये होते. तेथे या पक्षाने आठ जागा जिंकल्या होत्या. नाशिक, पुणे, जालना, लातूर, बुलडाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर या सात जिल्हा परिषदेत एक-दोन सदस्यच निवडून आले होते. शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात दुसरे स्थान मिळाले होते. या पक्षाने ६२ पैकी १९ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीने वीस जागा पटकावल्या होत्या. सोलापुरात तीन आणि परभणीत एक अशा अन्य दोनच ठिकाणी चार जागा या पक्षाला मिळाल्या होत्या. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय रिपब्लिकन पक्षाला केवळ बुलडाण्यात चार जागा मिळाल्या. (या पक्षाची अकोला जिल्हा परिषदेत सत्ता आहे; पण तेथे आता निवडणूक नाही.) परभणी जिल्हा परिषदेत सीताराम घनदाट यांना मानणाऱ्या घनदाट मित्रमंडळास तीन जागा मिळाल्या होत्या.महाराष्ट्राच्या राजकारणात जनता पक्षाची एके काळी ताकद होती. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने ९९ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून स्थान निर्माण केले होते. दिवंगत नेते राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील या पक्षात जनता लाटेत समाजवादी, जनसंघ आणि संघटना काँग्रेसचे लोक एकत्र आले होते. जनता पक्षाच्या फुटीनंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. संघटना काँग्रेसचे नेते पुन्हा मूळ काँग्रेस पक्षात सामील झाले. समाजवादी विचारांच्या गटाने पुढे जनता दलाची स्थापना केली. या पक्षाचे दहा ते पंधरा आमदार निवडून यायचे. या पक्षाची सध्याची अवस्था फारच बिकट आहे. समाजवादी किंवा प्रजा समाजवादी पक्षांचे अस्तित्वच संपले आहे. जिल्हा परिषदांमध्ये या पक्षाचे सदस्य नाहीत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपालिकेत या पक्षाने बहुमत आणि नगराध्यक्षपद पटकाविले, एवढेच मर्यादित यश आहे.चालू वर्षी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन-तीन जिल्ह्यांत इतर पक्षांची भूमिका निर्णायक ठरेल, त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा समावेश आहे. अन्यथा इतर पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांचे यश केवळ एक आकडीच असेल. या पंचवीस जिल्हा परिषदांमध्ये गत निवडणुकीत एकूण १,५१६ सदस्य होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ५११ जागा जिंकून प्रथम क्रमांक पटकावला होता. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर ४१९, शिवसेना तिसऱ्या स्थानावर २३३ आणि भारतीय जनता पक्ष १६५ जागा जिंकून चौथ्या स्थानावर होता. इतर पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांना १२५ जागा मिळाल्या होत्या. त्यात मनसे आणि शेकापचा समावेश आहे. अपक्षांनी ६३ जागा पटकावल्या होत्या. वसंत भोसले