मुंबई : सुमारे ३२ तास बेकायदा डांबून ठेवून आणि सक्तीने वैद्यकीय चाचण्या घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसांनी नवी मुंबईतील ऐरोली येथील एका सिव्हिल इंजिनियर तरुणाच्या सन्मानाने जगण्याच्या मुलभूत हक्काची पायमल्ली केल्याबद्दल राज्य सरकारने या तरुणास दोन लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.सेक्टर ४, ऐरोली येथे राहणाऱ्या सतीश वसंत साळवी या ३१ वर्षीय तरुणास सरकारने ही भरपाईची रक्कम आठ आठवड्यांत दिली नाही त्यावर १२ टक्के दराने व्याज द्यावे लागेल, असाही आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. श्रीमती इंदू जैन यांच्या खंडपीठाने दिला. याखेरीज साळवी यांना सरकारने दाव्याच्या खर्चापोटी २० हजार रुपये द्यावेत, असाही निर्देश न्यायालयाने दिला.साळवी यांना ज्यांनी बेकायदा अटक केली व ज्यांनी त्यांच्या सक्तीने वैद्यकीय चाचण्या करवून घेतल्या त्या अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन.वाय अंतराप यांच्यावर मोठ्या शिक्षेसाठी खातेनिहाय चौकशी करून सरकारने भरपाईची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असेही न्यायालयाने सांगितले.पूर्वी अंबड पोलीस ठाण्यात पाच वर्षे पोलीस निरीक्षक राहिलेले चंद्रकांत दिपक बळनागर यांच्या मुलीशी साळवी यांचा ३१ मे २०१३ रोजी विवाह झाला. जेमतेम अडीच महिने सासरी राहून वडील आजारी असल्याचे कारण सांगून साळवी यांची पत्नी माहेरी गेली. दोन महिन्यांनी येताना ती सोबत वडिलांना घेऊन आली. आई-वडिलांपासून वेगळे राहणार असशील तरच सोबत राहीन, अशी तिने अट घातली. साळवी यांनी यास असमर्थता दर्शविल्यावर ती माहेरी निघून गेली.माहेरी गेल्यावर तिनेअंबड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सात लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करण्यासह इतर गुन्ह्यांची फिर्याद नोंदविली. त्यानंतर तीन आठवड्यांनी अंतराप ऐरोलीस आले व साळवी यांना अटक करून अंबडला घेऊन गेले. दंडाधिकाऱ्यांकडून रिमांड घेण्याआधी त्यांनी औरंगाबाद येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नेऊन साळवी यांची सक्तीने पौरुषत्व चाचणी करून घेतली.पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर आता राजकारणात सक्रिय असलेल्या सासऱ्याच्या दबावामुळेच अंतराप यांनी बेकायदा अटक व सक्तीने वैद्यकीय चाचण्या करून साळवी यांची समाजात बेअब्रु केली, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला. (विशेष प्रतिनिधी)काय म्हटले न्यायालयाने?-१३ एप्रिल २०१४ रोजी पहाटे तीन वाजल्यापासून ते १४ एप्रिलच्या साकळी ११ वाजेपर्यंत अंतराप यांनी दंडाधिकाऱ्यांकडून रीतसर रिमांड न घेता साळवी यांना बेकायदा डांबून ठेवले.-वस्तुत: साळवी यांच्यावर ज्या कथित गुन्ह्यांची फिर्याद त्यांच्या पत्नीने नोंदविली होती त्याचा त्यांच्या पौरुषत्वाशी काहीही संबंध नव्हता. तरीही अंतराप यांनी त्यांची त्यासाठी वैद्यकीय तपासणी करून घेतली. साळवी यांची मानसिक तपासणी करून घेण्याचाही त्यांचा इरादा होता. परंतु न्यायालयाच्या आदेशाशिवाय ती करण्यास इस्पितळाने नकार दिला.-या दोन्ही प्रकारे मुलभूत हक्कांची पायमल्ली झाल्याबद्दल प्रत्येकी एक लाख याप्रमाणे साळवी यांनी एकूण दोन लाख रुपये भरपाई.-याखेरीज स्वतंत्र भरपाईसाठी दिवाणी दावा करण्याचीही मुभा.
बेकायदा अटकेबद्दल भरपाई
By admin | Updated: June 21, 2015 01:33 IST