मुंबई : राज्य परिवहन विभागाने ई-बाइक टॅक्सी सेवेसाठी तयार केलेल्या नियमावलीवर नागरिकांनी ८५ सूचना-हरकती नोंदवल्या आहेत. त्यात ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करू नका, अशी मागणी करण्यात आली आहे. या हरकती-सूचना सरकारकडे पाठवल्या आहेत.
मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नियम तयार केले आहेत. त्या नियमावलीवर ५ जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या. हरकतींपैकी १० संघटना, ८० हून अधिक नागरिकांनी हरकती नोंदविल्या. त्यात ही सेवा सुरू न करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा?
मुंबई महानगर प्रदेशातील अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही या सेवेला विरोध केला आहे. त्यांच्या मते, या सेवेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतील, तसेच रिक्षाचालकांच्या रोजगारावरही गदा येण्याची शक्यता आहे.
निर्णयाकडे लक्ष
देशातील १२ राज्यांमध्ये सध्या ही सेवा सुरू आहे. मात्र, कर्नाटकमध्ये काही अडचणींमुळे ती तात्पुरती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्यांतील अनुभवाचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नियम तयार केले आहेत.
असे असले तरी या सेवेला राज्यात वाढत विरोध पाहता यावर सूचना आणि हरकतींवर काय निर्णय घेण्यात येणार, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.