पुणे : पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत बंडखोरीचे राजकारण रंगले आहे. पदवीधर मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे सांरग पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच अरूण लाड व कॉंग्रसचे सुरेश जैन यांनी बंडखोरी केली आहे. तर शिक्षक मतदार संघात कॉंग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहन राजमाने यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश ताकवले यांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार लाड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी पलूस केडगाव पासून रॅली काढली होती.या रॅलीत दोनशे पेक्षा जास्त वाहने होती, असे सांगण्यात येत आहे. लाड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी प्रचार देखील सुरू केला होता. मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर त्यांचे तिकिट कापण्यात आले. सिक्कीमचे राज्यपाल तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू श्रीनिवास पाटील यांचे चिंरजीव सांरग पाटील यांना लाड यांच्या ऐवजी उमेदवारी दिली गेली. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार पाटील यांनी देखील सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष अरूण घुले,बारामती व इंदापुरचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापुर्वी लाड यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी उमेदवारी कापली गेल्याने नाराज झाल्याचे त्यांना पत्रकारांशी बोलताना सांगितले. लाड म्हणाले, पक्षाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करीत असूनही मला डावलण्यात आले. निवडणुकीसाठी पक्षाची तालुकानिहाय बांधणी मी केली. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला विजय मिळवूण देण्यातही माझा वाटा मोठा होता. असे असूनही उमेदवारी न देणे ही शोकांतिका आहे. वैयक्तिक संबंधामुळेच पाटील यांनी उमेदवारी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पाटील यांना उमेदवारी देवून घराणेशाही केल्याची टीकाही त्यांनी केली. बंडखोर उमेदवार अर्ज माघारी घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी वक्तव्य केले होते. त्याची आठवण लाड यांना करुन दिल्यावर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांच्या जोरावरच असा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पदवीधर मतदारसंघासाठी ९, तर शिक्षक मतदारसंघासाठी १० उमेदवारांनी अर्ज भरला आहे. मंगळवारी (दि.३) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, बुधवारी (दि.४) अर्ज माघारीची मुदत आहे.