मुंबई : मुंबईसारख्या महानगरात वसलेल्या विस्तीर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला (नॅशनल पार्क) जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार असून, येत्या अर्थसंकल्पात वनविकासासाठी प्रभावी योजना प्रस्तावित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार यांनी बोरीवलीतील नॅशनल पार्कचा पाहणी दौरा केला, या वेळी त्यांनी नॅशनल पार्कच्या जागेवरील अतिक्रमण व नागरिकांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला. लोकांना जसा जगण्याचा अधिकार आहे तसा वन्यप्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. हे लक्षात घेऊन परस्पर पूरक पद्धतीने वनांचा विकास करण्याचे काम केले जाईल, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दरदिवशी देशातील ४० टक्के पर्यटकांचे आगमन होते. त्यातील ३२ टक्के पर्यटक केवळ २४ तासांत देशातील विविध राज्यांमध्ये पर्यटनासाठी जातात. त्यांनी मुंबईत थांबून पर्यटनाचा आनंद घ्यावा, अशी स्थळे विकसित करण्याचे आव्हानात्मक काम आपण हाती घेतले आहे. महानगरांलगत असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची संख्या मुळातच खूप कमी आहे. त्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे घनदाट जंगल पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास त्याचा राज्याच्या उत्पन्नात फायदा होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. या वेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘बटर फ्लाइंग इन संजय गांधी नॅशनल पार्क’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.(प्रतिनिधी)
‘नॅशनल पार्क’ला जागतिक दर्जा देऊ’
By admin | Updated: November 17, 2014 04:03 IST