विठ्ठल कवडे, पंढरपूरनाशिकहून निघालेली सायकल दिंडी ३६५ किलोमीटरचे अंतर पार करून पंढरीत पोहोचली. या दिंडीचे हे सलग पाचवे वर्ष असून ‘नाशिकची सायकल वारी, लयभारी’, ’सायकल चालवा, इंधन व पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत ही वारी निघाली होती.नाशिक लगतच्या परभणी, नांदेड या जिल्ह्यातील ९ वर्षांपासून ते ७३ वर्षांपर्यंतची लहान मुले, महिला व पुरुष वारकरी या सायकल दिंडीत सहभागी झाले आहेत. ४० डॉक्टर, तीन एसीपी, एक कमिशनर यांच्यासह वकील, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, नगरसेवक यांच्यासह अनेक वारकरी या सायकल दिंडीत सहभागी झाले आहेत.पाच वर्षांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हरीश बैजल यांनी अवघ्या ४८ मित्रांच्या सहकार्याने ही सायकल दिंडी सुरू केली. यंदा तर, ४०० हून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. शनिवारी रात्री टेंभुर्णी येथे मुक्काम करून रविवारी दुपारी १च्या सुमारास पंढरीत पोहोचली. वारकऱ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करून पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी त्यांचा या सायकल दिंडीच्या माध्यमातून प्रयत्न आहे. माळशिरस तालुक्यात संतांच्या पालख्यांचे आगमनश्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासमवेत संत सोपानकाका, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी) यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे माळशिरस तालुक्यात आगमन झाले. या पालखी सोहळ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.पंढरपूरच्या भाविकांसाठी वऱ्हाडात एसटीची खास व्यवस्थाबुलडाणा : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने वऱ्हाडातून विशेष सेवा उपलब्ध केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २९ गाड्या वाढवत यावर्षी २५0 बसेस सोडण्यात येणार आहेत.पश्चिम वऱ्हाडातील भाविकांना पंढरपूरला जाणे सोईचे व्हावे यासाठी महामंडळाच्यावतीने बुलडाणा व अकोला विभागातून २५० एसटीबस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातून एकूण १०० गाड्या तर, अकोला विभागातून १५० गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबरोबरच ज्या गावातून किमान ५० भाविक पंढरपूरला जाण्यासाठी तयार असतील त्यांच्यासाठी स्वतंत्र बस त्या गावातून सोडण्यात येणार आहे. गतवर्षी ७० हजार भाविकांना लाभबुलडाणा व अकोला विभागातून गतवर्षी पंढरपूर यात्रेकरीता २२१ बसद्वारे ९६४ फेऱ्या झाल्या होत्या. त्याद्वारे ७० हजार २५३ भाविकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीत १ कोटी ९ लाख ६ हजार ८५२ रुपये उत्पन्नाची भर पडली होती.
नाशिकची सायकल वारी पंढरीत
By admin | Updated: July 11, 2016 05:52 IST