मुंबई : महिनाभर दडी मारलेला पाऊस सोमवारी रात्री आणि त्यानंतर मंगळवारी दिवसभर कोसळला. या संततधारेने गोवंडीतील सम्राट अशोक नगरमध्ये भिंत कोसळून नाईक राजा परवेज आलम अन्सारी या २ महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.सोमवारी मध्यरात्री २ वाजल्यानंतर शहरासह उपनगरांत संततधार सुरू होती. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकलसेवा सकाळी काही काळ ठप्प पडली आणि काही मिनिटांच्या प्रवासासाठी मुंबईकरांना दोन ते तीन तास खर्ची घालावे लागले. रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांवरही वाहतूककोंडीने मुंबईकरांच्या त्रासात भर घातली. या सर्व गोंधळामुळे सकाळी चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली. दुपारनंतर मात्र पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली. तरीही सायंकाळपर्यंत लोकल थोड्या उशिरानेच धावत होत्या. मुंबई : मुंबईत सोमवारी रात्री झालेल्या संततधारेचा फटका मंगळवारी दहावीच्या फेरपरीक्षेलाही बसला. रेल्वे सेवा कोलमडल्याने ठराविक परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी वाढीव वेळ देण्याचे आदेश परीक्षा मंडळाने दिले होते. दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेला मंगळवारी सुरूवात झाली. मात्र मुसळधार पावसामुळे शहरासह उपनगरातील अनेक विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहचू शकले नाही. त्याची दखल घेत मुंबई विभागीय मंडळाला एसएससी मंडळाने वेळ वाढवून देण्याचे आदेश दिले. वाढीव वेळेचा फायदा प्रामुख्याने विरार आणि पालघर विभागातील विद्यार्थ्यांना झाला. मंडळाचे सचिव वाय. सी. चांदेकर यांनी सांगितले की, या दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी वाहतूक व्यवस्थाही कोलमडली होती. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली..
मुंबईला पावसाने झोडपले
By admin | Updated: July 22, 2015 01:30 IST