मुंबई : देशातील सायबर गुन्हेगारी तपास यंत्रणांत मुंबईच्या पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सायबर गुन्हेगारी हाताळण्याच्या क्षमतेत उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या सायबर दलांहून अधिक उजवे ठरलेल्या मुंबई पोलीस दलाला नासकॉम (द नॅशनल असोसिएशन आॅफ सॉफ्टवेअर अॅण्ड सर्व्हिसेस कंपनीज्) आणि डीएससीआय (डाटा सिक्युरिटी कौन्सिल आॅफ इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅपॅसिटी बिल्डिंग आॅफ लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज्’ या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.याबाबत वांद्रे-कुर्ला संकुल सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर मोरे म्हणाले, मुंबई पोलीस दलाने गुन्हे शाखेअंतर्गत १८ डिसेंबर २००० रोजी सायबर गुन्हे अन्वेषण कक्ष (सायबर सेल)ची स्थापना केली. त्यानंतर २००४ साली नॅसकॉमच्याच संयुक्त विद्यमाने पोलीस दलाने मुंबई सायबर लॅब सुरू केली. त्या माध्यमातून मुंबईतील पोलिसांना सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करावा यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबईतील पोलीस अधिकारी अंमलदार आज सायबर गुन्ह्यांची उकल करण्यास सक्षम आहेत. मुंबईच्या पोलीस दलाकडे सायबर सेल आणि सायबर लॅबव्यतिरिक्त राज्यातील पहिले आणि देशातील तिसरे सायबर पोलीस ठाणे आहे सायबर सेल, सायबर लॅब, पोलीस ठाणे आणि इनहाउस फॉरेन्सिक लॅब या सर्व यंत्रणेचा वापर मुंबई पोलीस दल राज्यातील सर्व पोलीस ठाणे आणि शाखांना मार्गदर्शन करण्यासाठी करीत आहे. (प्रतिनिधी)
सायबर गुन्हे हाताळण्यात मुंबई पोलीस दल ‘अव्वल’
By admin | Updated: December 27, 2014 04:36 IST