Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. या नसरंसहारामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पाकिस्तान असल्याचा आरोप भारताकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान आता भारताला धमक्या देत आहे. अशातच भारतातून सर्वपक्षीय नेत्यांकडून पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांनाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर आपला भाग होता, आहे आणि राहील आणि काश्मिरी देखील आपला भाग आहेत, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानवर पुन्हा टीका करताना एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तान भारतापेक्षा अर्ध युग मागे असल्याचे म्हटलं. पाकिस्तान, आयसिस आणि लश्कर ए तोयबा हे भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अधिक द्वेष पसरवायला पाहत आहेत. पण त्यांचे कट उधळून लावण्यासाठी आपल्याला एकजूट राहावे लागेल, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.
ओवैसी हे परभणी येथे नव्या वक्फ कायद्याच्या निषेधार्थ जाहीर सभेत बोलत होते. "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास नाही तर अर्ध युग मागे आहात. पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत. तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही. पाकिस्तान वारंवार म्हणतो की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन निष्पाप लोकांना मारले तर कोणताही देश गप्प बसणार नाही. तुम्ही कोणत्या धर्माबद्दल बोलत आहात? तुम्ही वाईट आहात. हे कृत्य दाखवत आहे की तुम्ही आयसिसचे उत्तराधिकारी आहात," असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
"पाकिस्तान अनेक वर्षांपासून भारताला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला पाकिस्तानी हवाई दलाची नाकेबंदी करण्याची आणि हॅकर्सचा वापर करून त्यांचे इंटरनेट हॅक करण्याची परवानगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. देशाच्या पंतप्रधानांना सांगायचे आहे की जेव्हा काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं जातं तेव्हा काश्मिरी देखील आमचे आहेत.काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील आणि काश्मिरी देखील आमचेच आहेत," असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.