मुंबई, दि. 25 - आरोपीला जोपर्यंत पोलीस अटक करत नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका आरेमध्ये लैंगिक अत्याचारानंतर मृत्यू झालेल्या तेरा वर्षीय मुलाच्या पालकांनी घेतली आहे. मुलाचा मृतदेह पोलीस चौकीसमोर ठेऊन स्थानिकांनी पोलिसांना घेराव घातला आहे. यामुळे पवईत तणावाचे वातावरण आहे.आरेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर विष प्राशन केलेल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. 13 वर्षीय मुलाचा मंगळवारी सकाळी साडे चार वाजता केईम हॉस्पिटलमध्ये पीडित मुलाचा मृत्यू झाला. गेले पंधरा दिवस या मुलाची केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू होती. आरेमधील मोरारजी नगरमध्ये आसिफ (नाव बदलले आहे) आणि सुनील (नाव बदलले आहे) ही दोन्ही पिडीत मुले राहत होती. यातील एक मुलगा दहा वर्षांचा तर दुसरा तेरा वर्षांचा आहे. 12 जुलै रोजी या मुलांनी उंदीर मारायचे विष प्राशन केले. ही बाब त्यांच्या पालकांना समजली तेव्हा त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, यात आसिफचा मृत्यू झाला. तर, सुनीलला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी तो चार दिवस होता. मात्र, त्याचे लिव्हर निकामी झाल्यामुळे त्याला तातडीने परळच्या केईम रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. पण मंगळवारी सकाळी उपाचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. माझ्यावर आणि माझ्या मित्रासोबत सुद्धा अत्याचार झाला आहे आणि याच लाजेमुळे आम्ही दोघांनीही विष प्यायलो आहे, असं या मुलाने सांगितलं होतं. हा धक्कादायक प्रकार आरे परिसरात घडला असून याप्रकरणी पवई पोलीस चौकशी करत आहेत.नेमके काय घडले ?सुनीलच्या वडिलांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास त्याला अचानक उलटी झाली. तेव्हा त्यांनी मुलाची चौकशी केली. तेव्हा मी उंदीर मारायचे विष प्यायलोय असे सांगितले. त्यानंतर आम्ही त्याला सायन रुग्णालयात हलविले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला केईम रुग्णालयात हलविण्यात आले. इथे त्याचे लिव्हर पूर्णपणे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सुनील वेदनेने कण्हत असताना वडिलांना म्हणाला की, तुम्ही मला ओरडलात म्हणुन मी विष प्राशन केले नाही, तर माझ्यावर लैगिंक अत्याचार झालेत. आरेच्या गौतमनगरमध्ये एका खोलीत नेऊन माझ्यासह माझ्या मित्रासोबत हा प्रकार घडल्याचे सुनीलने आपल्या वडिलांना सांगितले. ट्युशन टिचरला आला संशय !सुनील गेल्या काही दिवसांपासून भेदरलेल्या अवस्थेत होता. ही बाब त्याच्या ट्युशन टिचरच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावून याबाबत सांगितले. तसेच त्याचा मोठा भाऊ देखील त्याला वारंवार याबद्दल विचारत होता. मात्र त्याने भावलाही काहीच सांगितले नाही आणि अखेर विष प्यायले, असे सुनीलच्या वडिलांनी सांगितले.
आरोपीला अटक नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार नाही, पवईत तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 16:38 IST