मुंबई : राज्यात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. विशेषत: विदर्भात वाढत्या कमाल तापमानाने कहर केला असून, येथील कमाल तापमान थेट ४४ अंशांवर पोहोचले आहे. शुक्रवारी चंद्रपूरचे कमाल तापमान ४४ अंश नोंदविण्यात आले असून, पुढील चार दिवसांसाठी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला गारांचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईचे कमाल तापमान मात्र ३३ अंशांवर स्थिर असले तरी उकाडा वाढला असून ‘ताप’दायक उन्हासह उकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाड, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.
मुंबईत आकाश ढगाळमुंबईत १३ आणि १४ एप्रिल रोजी सायंकाळसह रात्री आकाश ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान ३३, २५ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.मराठवाडा, विदर्भाला पावसाचा इशारा१३ एप्रिल : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल.१४ एप्रिल : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडले.१५ एप्रिल : मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल.१६ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.