वर्षानुवर्षांचे दुर्लक्ष आणि तुटपुंजी गुंतवणूक यामुळे गलितगात्र झालेल्या भारतीय रेल्वेचा येत्या पाच वर्षांत पुनर्जन्म घडवून आणण्याचा संकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात व्यक्त केला. त्यासाठी काय करावे लागेल, याची रूपरेषाही त्यांनी मांडली. पण हे सर्व साध्य कसे करायचे, असा प्रश्न त्यांनाच पडला. या प्रश्नाचे उत्तर त्यांना परमेश्वराकडूनही मिळाले नाही. शेवटी शुभदा गोगटे यांनी लिहिलेल्या ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ या जुन्या मराठी कादंबरीच्या कथानकात त्यांना याचे उत्तर मिळाले. सह्याद्रीचे कडे पार करून भारतातील पहिला रेल्वे मार्ग कसा बांधला गेला याचे लालित्यपूर्ण वर्णन शुभदा गोगटे यांनी या कादंबरीत केले आहे.यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील संदर्भित उतारा मुळातूनच उद््धृत करणे उद््बोधक आहे. प्रभू म्हणाले..... ‘‘पर मेरे मन मे सवाल उठता है- हे प्रभू, ये कैसे होगा? प्रभू ने तो जवाब नही दिया, तब ये प्रभूने सोचा (यावर सभागृहात हशा पिकतो) की, गांधीजी जिस साल भारत (वापस) आये थे, इनकी शताब्दी वर्ष में भारतीय रेल्वे को एक भेंट मिलनी चाहिये, की परिस्थिती बदल सकती है, रास्ते खोजे जा सकते है, इतना बडा देश, इतना बडा नेटवर्क, इतने सारे रिसोर्सेस, इतनी विशाल मॅनपॉवर, (पंतप्रधान मोदींकडे पाहात) इतनी स्ट्राँग पोलिटिकल विल, तो क्यों नही हो सकता रेल्वे का पुनर्जन्म.....(या प्रश्नाचे उत्तर शोधताना) मला शुभदा गोगटे यांच्या ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ या कादंबरीची आठवण झाली. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून भारतातील पहिला रेल्वेमार्ग कसा बांधला गेला याचे मार्मिक वर्णन या कादंबरीत आहे. एकावेळी रेल्वेमार्गाचा एक तुकडा बांधायचा. एकावेळी एक बोगदा खणायचा. ते पूर्ण झाले की पुढील रेल्वेमार्ग व बोगद्याचे काम हाती घ्यायचे. मूळ रेल्वेमार्ग जसा थोडा थोडा करून बांधला गेला तसाच रेल्वेचा पुनर्जन्मही टप्प्याटप्प्यानेच करता येईल.
मराठी कादंबरीने दिले प्रभूंच्या प्रश्नाचे उत्तर!
By admin | Updated: February 27, 2015 02:30 IST