शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

तात्या, तुम्ही ‘गांधी’ विचारांची गरज यावर काहीतरी लिहा..!

By अतुल कुलकर्णी | Updated: February 27, 2022 10:01 IST

तुम्ही लिहिलेल्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता आम्ही सतत वाचत आलोय.

अतुल कुलकर्णी

आदरणीय कुसुमाग्रज, ऊर्फ आमचे तात्या, 

नमस्कार.

तुम्ही लिहिलेल्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता आम्ही सतत वाचत आलोय. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ती लिहून ठेवली होती. हल्ली ती तेथे दिसत नाही. कदाचित त्याची गरज उरली नसेल. पण आम्ही तुमची ती कविता आत्मसात केलीय. त्यानुसारच आम्ही वागतो. तुमच्या कवितेतील ओळींचा आधार घेऊन ते पटवून देऊ शकतो म्हणजे आम्ही तुमच्या कवितांनी कसे सुधारलो हेही तुमच्या लक्षात येईल.पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका।

असं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात. आम्ही हल्ली आमच्या आई-वडिलांना अभिवादन करत नाही तर स्वातंत्र्यदेवीला करायचा कुठे प्रश्न येतो. तेव्हा तुम्ही ती अपेक्षाही ठेवू नका... सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं बरं... 

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे।करतिल दुसरे, बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका।।

तुम्ही हे जे सांगितले ते आम्ही तंतोतंत पाळत आलोय. आम्ही वेतनाला हातच लावत नाही. अनेकदा तर बँकेत जमा झालेल्या वेतनाला हात लावण्याचीही गरज पडत नाही. सगळं वरच्यावर भागून जातं. ‘करतिल दुसरे’, असेही आम्ही म्हणत नाही. आम्ही जे करायचं ते बरोबर करतो. त्यासाठी जे ‘घ्यायचं’ ते स्पष्ट बोलून घेतो आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे कोणाला सांगत सुटत नाही आम्ही...

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना।कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका।

आम्ही आता पुतळ्यांभोवती कायमचे सुरक्षारक्षक ठेवले आहेत. कधी कधी आमच्यातल्या कोणाला राजकीय फायदा लाटायचा असेल तर तो ती व्यवस्था दुसरीकडे कशी जाईल हे पाहतो. मग काही ठिकाणी दंगल होते, दगडफेक होेते... पण हे सगळं कोणी केलं हे आम्ही कोणालाही सांगत नाही... त्यामुळे त्याचे गोडवे गाण्याचा तर प्रश्नच येत नाही कधी...

भाषा मरता देशही मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे।गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापू नका।।

ही ओळ तर आता तुम्हाला कधी लिहायची वेळच येणार नाही तात्या. गेले काही दिवस आम्ही मराठी भाषेत एवढ्या नवनवीन शब्दांची भर टाकली आहे की त्याचाच नवा शब्दकोष करावा लागेल. ‘भाषा मेली की देश मरतो’ हो तुमचा संदेश आम्ही एवढा मनावर घेतलाय की गेले काही दिवस आमच्या अनेक नेत्यांनी भ ची, म ची बाराखडी नव्याने लिहायला घेतली आहे. शिव्या शापांचा ग्रंथही करता येतोय का याचेही प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे त्याची आता चिंताच राहिली नाही. 

स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे।सदन आपुले करा सुशोभितदुसऱ्याचे पण जाळू नका।।

जे धन घेतो ते ‘स्वच्छ’ करुन घेण्याचेही मार्ग आम्ही शोधले आहेत. बाजारात हल्ली नवनवीन ‘वॉशिंग मशीन’ पण आल्या आहेत. त्यात गेलं की सगळं स्वच्छ होऊन जातं... त्यामुळे जाळपोळीची गरज उरली नाही तात्या. सध्या तरी आम्ही फक्त आमचं सदन कसं सुशोभित करता येईल ते पाहतोय. त्याला सोन्याची माडी कशी करायची हा एकमेव ध्यास आम्ही... एकदा का आमचं झालं की दुसऱ्याचं आपोआप भिकार दिसणार... मग ते जाळायची गरज काय उरणार...? त्यामुळे आता आम्हाला तुमच्या कवितांची तशी फार गरज उरलेली नाही. 

काही जण म्हणतात की, जीवनाचं सार सांगणारी बहिणाबाई आम्हाला आतून हलवून टाकत नाही... ज्ञानदेव, तुकारामांचे अभंग आम्हाला आजच्या जगण्याशी संयुक्तिक वाटत नाहीत... तुमच्या कविता जगण्याची प्रेरणा आहेत हे खरं वाटत नाही... पण या गोष्टींना आताच्या जमान्यात काही अर्थ उरलेला नाही. मराठी साहित्यापेक्षा ‘गांधी’चे फोटो छापलेल्या साहित्यावर श्रद्धा ठेवायला पाहिजे. तुमची ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता जुनी झाली. आता तुम्ही ‘गांधी’ विचारांची गरज यावर काहीतर लिहा...

तुमचाच, बाबुराव 

टॅग्स :marathiमराठी