मुंबई: वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर प्रवेशांमध्ये मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण या शैक्षणिक वर्षापासूनच लागू करणारा वटहुकूम राज्यपाल विद्यासागर राव यांनी सोमवारी जारी केला. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना आरक्षित जागांवर दिलेले जे प्रवेश न्यायालयीन निर्णयांमुळे रद्द झाले होते, ते आता पुनरुज्जीवित होतील व अर्धवट प्रवेशप्रक्रियाही मार्गी लागेल.
राज्य मंत्रिमंडळाने वटहुकुमाची शिफारस राज्यपालांना केली होती. प्रवेशाच्या जागा वाढविण्याची विनंती केंद्र सरकारला व प्रवेशांची अंतिम मुदत ३१ मेपर्यंत वाढविण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयास केली जाणार आहे. या आरक्षणामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांत व्यवस्थापन कोट्यात प्रवेश घ्यावे लागतील, त्यांना राज्य सरकार शिष्यवृत्तीही देणार आहे.
मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम केल्याचे सीईटी सेलकडून निर्देश जारी करण्यात आले. त्यामुळे आंदोलनाला बसलेले विद्यार्थी मंगळवारी सकाळी आंदोलन मागे घेणार आहेत.