महारचिकना गाव विकणे आहे !
By Admin | Published: June 28, 2014 10:24 PM2014-06-28T22:24:49+5:302014-06-28T22:38:27+5:30
दूर्लक्ष झाल्यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी गावच विक्रीस काढले
महारचिकना : गारपिट व अवकाळी पावसामुळे येथील अनेक शेतकर्यांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले होते. ते नुकसानग्रस्त शेतकरी आजही शासनाच्या अर्थिक मदतीपासून वंचीत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे वेळोवळी निवेदने देऊनही दूर्लक्ष झाल्यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी गावच विक्रीस काढले असून, 'महारचिकना गाव विकणे आहे' असे फलकही गावात लावले आहेत.
मार्च-एप्रिल २0१४ मध्ये वादळी वार्यासह गारपिट व अवकाळी पावसाने परिसरात थैमान घातले होते. गारपिटीमुळे महारचिकना येथील शेतकर्यांचे रब्बी पिकासह भाजिपाला व फळबागांचेही मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले होते. या गारपिटग्रस्त भागाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यकांनी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासनही शेतकर्यांना मिळाले होते. गावात जवळपास ३७१ नुकसानग्रस्त असून, त्यातील फक्त १५0 नुकसानग्रस्तांनाच मदत मिळाली आहे. बाकीचे सर्व नुकसानग्रस्त शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचीत आहेत. मदतीपासून वंचीत असलेल्या या नुकसानग्रस्तांनी तहसिलदार व इतरही वरीष्ठ अधिकार्यांना मदतीची मागणी केली आहे. परंतू, कुठलेच अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्याचबरोबर महारचिकना गाव शासनाच्या विविध योजनांपासून वंचीत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावचा विकासही थंडबस्त्यात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी महारचिकना गावच विक्रीस काढले आहे. गाव विक्रीनंतर येणारी रक्कम गारपिटग्रस्तांना देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.