अकोला : उन्हाळ्यात निर्माण होणार्या चाराटंचाईवर मात करण्यासाठी महाबीजच्यावतीने चारा व वैरण विकास आणि हिरवळीचे बियाणे बाजारात उपलब्ध करून देण्यात आले असून, जास्तीत जास्त प्रमाणात याचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा पाऊस वेळेवर व योग्य प्रमाणात येणार असून, खरीप हंगाम समाधानकारक राहणार असल्याचे भाकीत सर्वच स्तरांतून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामापूर्वीच महामंडळाने राज्यात बियाणे उपलब्ध करून दिले आहे. महाबीजमार्फत खरीप हंगामाकरिता विविध पिके व वाणांचे एकूण ५.४२ लाख क्विंटल प्रमाणित बियाणे राज्यातील १३५५ महाबीज विक्रेते व ग्रामपातळीवरील उपविक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ३,६१,९५६ क्विंटल, संकरित ज्वारी १२,0५६ क्विंटल, तूर १६, ७७१ क्विंटल, उडीद ११,१३४ क्विंटल, धान १,0१, २३२ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मूग, संकरित मका, बीटी कपाशी, चारा व वैरणाचे बियाणे, हिरवळीचे खत असलेले धैंचा तसेच भाजीपाल्याच्या बियाण्यांचा यामध्ये समावेश आहे. यंदाच्या हंगामाकरिता राज्य तसेच केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणार्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, तूर, मूग, उडीद, धान व सुधारित बाजरा आदी पिकांचे तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तूर, मूग, उडीद या पिकांचे व राष्ट्रीय तेलताड अभियान योजनेंतर्गत सोयाबीन पिकाच्या बियाण्यांचा तसेच हायब्रिड तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत हायब्रिड तूर वाणाचे बियाणे पुरवठा करण्यात आलेले आहे. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अरूण उन्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यात सर्वत्र बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच उन्हाळ्यात चाराटंचाई भासू नये, याकरिता चारा व वैरण विकास आणि हिरवळीचे बियाणेदेखील उपलब्ध केले असल्याचे स्पष्ट केले.
चाराटंचाई निवारणावर महाबीजचा भर
By admin | Updated: June 20, 2015 02:32 IST