लोणार (बुलडाणा): सतत ३ वर्षांंपासून अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक लोणार सरोवराचीही पाण्याची पातळी घटली असून, सरोवराच्या पाण्याची क्षारता ११.५0 एवढी वाढल्याने, पाणी आणखी खारट झाले आहे. शहरातील सांडपाण्यासह धारेचे पाणी सरोवरात वर्षानुवर्षापासून जात असल्यामुळे सरोवराचे खारे पाणी गोडे पाण्यात रुपांतरीत होऊ लागल्याने खार्या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्था हळूहळू नष्ट होत चालल्याची भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. उल्कापातामुळे तयार झालेल्या या सरोवरात जाणारे गोडे पाणी अडविण्याची मागणी जगभरातील शास्त्रज्ञांनी केली होती. पूर्वी सरोवराच्या खार्या पाण्यात दुर्मिळ चुंबकीय जिवाणूसह एकूण ३९ दुर्मीळ वास्तव्यास होते. सरोवराच्या तळापासून ६0 टक्के उंचीपर्यंंत विषारी व दुर्गंंध पसरविणारा हायड्रोजन सल्फाईड वायू होता. उरलेल्या ४0 टक्के पाण्यात ऑक्सीजनच नसल्याने, या खार्या पाण्यात कोणतेही प्राणी किंवा वनस्पती जिवंत राहू शकत नाही. पाण्याच्या पृष्ठभागावर हरीत निल शैवाल (ब्लू ग्रीन अँल्गी) हा शेवाळाचा दुर्मिळ प्रकार मोठय़ा प्रमाणात होता. यात स्पायरुलीना नावाचे जिवाणू आढळून येतात; मात्र मध्यंतरीच्या काळात सरोवराच्या खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर होऊ लागल्याने खार्या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्था नष्ट होत असल्याची भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. गत ३ वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सरोवराच्या पाण्याची पातळी घटली असून, त्यामुळे पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब सरोवरातील दुर्मिळ जैविक संस्थेसाठी पोषक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सरोवरातील पाण्याचा सामू ९ वरुन ११.५0 पर्यंंत वाढला आहे. त्यामुळे सरोवरातील दुर्मिळ जैवीक संस्था जिवंत राहण्यास मदत होईल, असे पुणे येथील खगोल विश्व मंडळाचे मयुरेश प्रभुणे यांनी स्पष्ट केले. *पावसाचे प्रमाण कमी झाल्याचा परिणाम सतत ३ वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आणि पाण्याच्या पातळीत घट झाली. त्यामुळे सरोवराच्या पाण्याचा सामू ९ वरुन ११.५0 एवढा वाढल्याने सरोवराचे पाणी पुन्हा खारट झाले आहे.
लोणार सरोवराच्या पाण्याच्या क्षारांचे प्रमाण वाढले
By admin | Updated: July 22, 2015 22:50 IST