यदु जोशी, मुंबईविधानसभेतील संख्याबळाच्या निमित्ताने सत्ताकारणाची जोरदार चर्चा सध्या सुरू असताना विधान परिषदेचे राजकारणही येत्या काळात रंगण्याची शक्यता आहे. भाजपाची राज्यात सत्ता येणार असली तरी वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेत ते अल्पमतात आहेत. त्यामुळे ज्येष्ठ सभागृहात भाजपाला बरीच कसरत करावी लागणार आहे. विधान परिषदेत सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादीचे, त्याखालोखाल काँग्रेसचे आहेत. भाजपा तिसऱ्या क्रमांकावर असली तरी त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये १० सदस्य संख्येचा फरक आहे. शिवसेनेबरोबर भाजपाने सत्ता स्थापन केली तर विधानसभेत त्यांना कुठलीही अडचण नाही. मात्र विधान परिषदेत युतीतील दोन्ही पक्षांचे मिळून तावडे, शेलार वगळल्यानंतर केवळ १५ सदस्य असतील. विधानसभेपेक्षाही भाजपाची जास्त कोंडी परिषदेत होऊ शकते. ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ करताना भाजपाची कसोटी लागेल.भाजपाने उद्या स्वबळावर सरकार बनविले तर परिषदेतील ९ सदस्य आणि ७ अपक्षांपैकी आपल्या समर्थक आमदारांना हाताशी धरून पुढे जाणे भाजपासाठी आणखीच कठीण असेल. अशावेळी सरकार स्थापनेसाठी भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊ करणाऱ्या राष्ट्रवादीने हीच भूमिका विधान परिषदेतही घेतली तर भाजपासाठी तो मोठा दिलासा ठरेल. विधान परिषदेत विधेयक नामंजूर झाले तर ते विधानसभेत पुन्हा आणून सरकारला मंजूर करवून घेता येते. मात्र विधान परिषदेतील नव्या सरकारचे अल्पमत लक्षात घेता सरकारवर तांत्रिक पराभवाची नामुश्की वारंवार ओढवू शकते.लगेच नाही, पण काही महिन्यांनंतर एकदा सरकारला संख्याबळाच्या दृष्टीने स्थैर्य आले की विधान परिषदेचे सभापतिपद आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. त्यासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली जाण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेचे राजकारण रंगणार
By admin | Updated: October 27, 2014 02:47 IST