पुणे : किरकोळ व्यापा-यांना त्रासदायक ठरलेल्या एलबीटी येत्या विधानसभा अधिवेशनात रद्द व्हावा अशी मागणी माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी केली. व्यापारी एकता दिनानिमित्त स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनच्या वतीने देण्यात येणा-या व्यापारभूषण पुरस्कार समारंभात ते बोलत होते. सुदर्शन स्टेशनरी मार्टचे किशनचंद करमचंदानी यांना व्यापारभूषण पुरस्कार देण्यात आला. जगाराम चौधरी, रामेश्वर जाजू, जीवन हेंद्रे, ज्योती पुरंदरे यांनाही पुरस्कार देण्यात आले.राम नाईक म्हणाले, एलबीटीमुळे व्यापारांना खूप अडचणी येत आहेत. या अडचणी मांडताना त्यांनी त्यावरील उपाययोजनाही सुचवून शासनाकडे पाठपूरावा करावा. भाजपच्या सुशासन विभागाचे प्रमुख या नात्याने सर्व चांगल्या सूचनाही आपण सरकारपर्यंत पोहचवू. किरकोळ व्यापार क्षेत्रात रोजगार निर्मितीला वाव असल्यानेच थेट परकीय गुंतवणूकीला भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे.यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष एस.के.जैन, असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश प्रभुणे, दिलीप कुंभोजकर, राजेश गांधी, मदनसिंह राजपूत उपस्थित होते.
येत्या अधिवेशनात एलबीटी रद्द व्हावा : राम नाईक
By admin | Updated: June 3, 2014 22:03 IST