नागपूर : शासकीय सुविधांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी वर्धा रोडवरील विमानतळासमोर चक्का जाम करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आंदोलनकर्त्या निराधार, निराश्रित महिलांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठीमार केला. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व परिसरातील शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या गरीब, मजूर, निराश्रित, निराधार, परित्यक्त्या, नेत्रहीन आदी महिलांनी क्रांतिकारी शेतकरी महिला संघटनेच्या नेतृत्त्वाखाली आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुपारी वर्धा रोडवर विमानतळासमोर आंदोलन केले. हातात लाटणे घेऊन आलेल्या ५००हून अधिक महिलांचा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न होता. पोलीस उपआयुक्त शैलेश बलकवडे हे आंदोलनकर्त्या महिलांना समजाविण्याचा प्रयत्न करीत होते की, त्यांच्या नेत्यांना मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी नेण्यात आले आहे. तरीही महिला हटत नसल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना वाहनांमध्ये बसवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सोडले. रात्री ९ पर्यंत आंदोलनकर्त्या एकमेकांना शोधत फिरत होत्या.
आंदोलनकर्त्या निराधार महिलांवर लाठीमार
By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST