फलटण : ‘कृष्णा खोऱ्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, हा भ्रष्टाचार झाला नसता तर कृष्णा खोऱ्यातील सर्व कामे पूर्ण झाली असती. काहीजण स्वत:ला कृष्णा खोऱ्याचे भगीरथ समजतात; मात्र ते स्वयंघोषित भगीरथ आहेत. निवडणुका आल्या की, थोडी कामे सुरू करायची, पाणी सोडायचे नाटक करायचे असली बहुरूपी कामे त्यांनी केली आहे. या कालव्याचे काम बहुरूपी भगीरथांनी थांबविले,’ असा घणाघाती आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजेंचे नाव न घेता केला.नीरा-देवघर धरणाच्या प्रलंबित कालव्याप्रसंगी व बारामती-इंदापूूरला पळविल्या जात असलेल्या पाण्यासंबंधी पुणे पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकारी व नीरा-देवघरचे अधिकारी यांच्या बैठकीचे शुक्रवारी आयोजन कोळकी येथील इरिगेशन बंगल्यावर करण्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब बागवान, न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील, कृष्णा खोऱ्याचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनुप शहा, तालुकाध्यक्ष सुशांत निंबाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख शंभूराज खलाटे, अॅड. नरसिंह निकम, विराज खराडे, धनंजय महामुलकर, जयकुमार शिंदे, शासकीय खात्याचे अधिकारी उपस्थित होते.नीरा-देवघरच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ही बैठक असून, कोणा व्यक्तीविरोधात बैठक नाही. कोणत्याही पक्षाची ही बैठक नाही. सगळेच पाण्यापासून वंचित असल्याने जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या हेतूने अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली असल्याचे प्रारंभी खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.‘माझा मतदारसंघ हा माझा देश आहे. मला बाँड्री-बिंड्री काही नाही. पाणी प्रश्नासंदर्भात जनभावना तीव्र असून, १८५७ च्या बंडासारखी वाट राज्यकर्ते व अधिकाऱ्यांनी पाहू नये. नीरा-देवघरचे बारामती, इंदापूरला जाणाऱ्या पाण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून, शरद पवार आपणाला हात जोडून विनंती आहे की, विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी जर तुमच्याकडे माणसे शिल्लक राहिली असतील, तर योग्य माणूस निवडा,’ असे आवाहन करत खासदार उदयनराजे भोसले यांनी एकप्रकारे रामराजेंच्या उमेदवारीला विरोध केला.‘सर्वसामान्यांच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण होतो, तोच प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे. नीरा-देवघरचे धरण बांधून १५ वर्षे झाले. पवारसाहेब... हात जोडून विनंती करतो!पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजेंनी थोडा पॉज घेत चक्क हात जोडले. ‘शरद पवारसाहेब... आपल्याला हात जोडून विनंती आहे की, विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी जर तुमच्याकडे माणसे शिल्लक राहिली असतील तर योग्य माणूस निवडा,’ असे सांगत उदयनराजेंनी एक प्रकारे रामराजेंच्या उमेदवारीला कडाडून विरोधच केला.‘सरकारी कामांना होणारा विरोध, अधिकाऱ्यांचा कारभार व निवडणुकीत मिळणारी खोटी आश्वासने याला जनता बंड करण्याच्या तयारीत आहेत. १८५७ चा स्वातंत्र्य लढा एका दिवसात उभा राहिला नाही, पार्श्वभूमी बनत गेली व तो लढा उभारला गेला. आताही तशी पार्श्वभूमी होत चाललीय. लोक कामे होत नसल्याने पेटत चालली आहेत,’ असेही ते म्हणाले.उदयनराजे उवाच...अजून कालव्याचा पत्ताच नाही. निवडून जाऊन मंत्रिपदावर जाणे सोपे असते; मात्र लोकांची जाण ठेवून कामे करणे अवघड असते. लोकांची कामे झाली नाहीतच. मी आवाज उठवतो म्हणजे काहीजण घरचा आहेर म्हणतात; मात्र कृष्णा खोऱ्यात झालेला भ्रष्टाचार हा एक कलंकच आहे. ज्यांनी कृष्णा खोऱ्याची अमर्याद सत्ता भोगली त्यांनी काय केलंय, हे तुम्हाला माहीतच आहे.’‘अधिकाऱ्यांनो... कोणा मंत्र्यांच्या दबावात येऊ नका, बदलीला भिऊ नका, जनतेच्या फायद्यासाठी तुम्ही तुमचे योगदान द्या, राजकारण्यांचे बस्सं झाले. तुमचे डोके चालवून पाणी आणा. भूसंपादनाचे आम्ही सर्व बघू. कोण राज्यकर्ता आडवा येत असेल तर सांगा. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यातील प्रत्येकाला बाहेरच काढणार आहे. पैसा म्हणजे काय यांच्या पिताश्रीची पेंड आहे काय,’ असेही उदयनराजे म्हणाले.अधिकाऱ्यांना झाप झाप झापडले...नीरा-देवघरचे धरण बांधून किती वर्षे झाली, असे एका अधिकाऱ्याला खासदार उदयराजेंनी विचारताच त्यांनी ‘दहा वर्षे झाली,’ असे उत्तर दिले. यावर संतप्त बाळासाहेब बागवान यांनी ‘१५ वर्षे झाली. तुम्ही कसे दहा वर्षे म्हणताय,’ असे सांगताच खा. उदयनराजे यांनी ‘अधिकारी कमीच सांगणार, त्यांना गांभीर्य नाही,’ असा टोला लगावतच अधिकाऱ्यांनी नीरा-देवघर संदर्भात काय-काय केले, याची माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी सीडब्ल्यूसीची मान्यता मिळाली नसल्याचे सांगितले. यावर ‘नीरा-देवघरच्या कालव्यांच्या कामासाठी किती निधी लागेल, कसा मिळविता येईल, कोणाकोणाला भेटायला लागेल, याचा प्रस्ताव तयार करून द्या,’ असे सांगताच अधिकारी वर्ग टोलवाटोलवीचे उत्तरे देऊ लागली. सर्व मान्यता मिळवायच्या व सर्व प्रस्ताव तयार करायचा म्हणजे दोन वर्षे लागतील, असे एका अधिकाऱ्याने सांगताच, ‘मला रविवारपर्यंत सर्व प्रस्ताव द्या, कारणे सांगू नका, मला रविवारी प्रस्ताव न मिळाल्यास माझ्या पद्धतीने बघेन. काहीही करून कालव्याच्या कामासंदर्भात प्रस्ताव द्या, छाताडावर बसून संबंधिताकडून मी मान्यता आणतो,’ असे उदयनराजेंनी सुनावले.‘नीरा-देवघरचे पाणीवाटप अशा चुकीच्या पद्धतीने कसे झाले. अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना का विरोध केला नाही, असा जाब विचारताच मी इंजिनिअर आहे, तुम्हीही इंजिनिअर आहात, माझ्या जागी तुम्ही बसा तुमच्या जागी मी बसतो, काय होतोय बघू, असे आव्हान उदयनराजेंनी दिले.यावेळी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी नीरा-देवघर प्रकल्पासंदर्भात केलेल्या आंदोलनाची व पाणी वाटपाची माहिती दिली. ‘पाणीवाटप समितीने नीरा-देवघरच्या पाणी वाटपाचा केलेला निर्णय चुकीचा आहे. बारामतीच्या नेतेमंडळीच्या दबावाखाली व त्यांना दुखावले जाऊ नये, यासाठी तसेच लालदिवा व सत्ता टिकविण्यासाठी रामराजेंनी बारामती व इंदापूरचा हक्क नसतानाही त्यांना पाणी जाऊ दिल्याचा आरोप हिंदुरावांनी केला.कालवे झाले तर पाणी मिळणार नाही म्हणून बारामतीच्या नेतृत्वाने नीरा-देवघरच्या कालव्यांची कामे होऊ दिली नाहीत. या पाण्यासंदर्भात आता आक्रमक भूमिका घेणार आहे. उदयनराजेंनी लक्ष घातल्याने आता कालव्यांचा प्रश्न मार्गी लागेल,’ असा विश्वास हिंदुरावांनी व्यक्त केला.
हे तर स्वयंघोषित बहुरूपी भगीरथ!
By admin | Updated: March 13, 2015 23:57 IST