ठाणे : उन्हाळ्यात घोडबंदरच्या अनेक भागात महावितरणचे अघोषीत भारनियमन सुरु असतांनाच आता पावसाळ्यातही येथील अनेक भागांवर सतत जाणाऱ्या वीजेमुळे हैराण होण्याची वेळ आली आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ रात्री-अपरात्रीदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील रहिवासी आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. येत्या दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर महाविरणविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.महावितरणने घोडबंदरच्या अनेक भागात, भूमीगत वाहिन्या टाकण्याचे काम अधर्वटच सोडले आहे. निधी नसल्याचे कारण पुढे करुन ते रखडल्याचे उत्तर महावितरणचे अधिकारी देत आहेत. त्यातच उन्हाळ्यात अघोषीत भारनियमनाने हैराण झाल्याने घोडबंदरकरांना आता पावसाळ्यातही वीजेच्या लंफडावाचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून घोडबंदरच्या मानपाडा, शिवाजी नगर, आझादनगरचा काही भाग, टिकुजिनीवाडीचा काही भाग, मनोरमानगर, गणेश नगर, दुर्गानगर, ब्रम्हांडचा काही भाग आदींसह डोंगरीपाडा, पातलीपाडा आदी भागांनाही वांरवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना मानपाडा, बुद्धविहार परिसरात घडली होती. या ठिकाणी नवीन वायर टाकण्याची मागणी करुनही महावितरण त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या तर, दिवसातून १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यात रात्री, अपरात्रीदेखील तो खंडित झाल्याने येथील रहिवाशांचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे.विशेष म्हणजे एखाद्या वेळेस वीजपुरवठा खंडित झाला तर त्याची तक्रार करण्यासाठी ढोकाळी येथील कार्यालयाला फोन केल्यास त्याठिकाणी एकही कर्मचारी फोन घेण्यासाठी हजर नसल्याचे दिसून आले आहे. तर काही वेळेस फोनच बाजूला ठेवला जात आहे. (प्रतिनिधी)>या संदर्भात स्थानिक नगरसेवकांकडेदेखील तक्रार करुन त्यांच्याकडूनही दाद मिळत नसल्याचे येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. त्यात मंगळवारी सकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुन्हा पाच मिनिटात सुरळीत सुरु झाला होता. परंतु, त्यानंतर पुन्हा तो खंडित झाला तो चार तासांनी सुरळीत झाला. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. परंतु, तसे न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
विजेच्या लपंडावामुळे घोडबंदरकर हैराण
By admin | Updated: June 29, 2016 02:59 IST