रोहा : गेले दोन दिवस कोसळलेल्या दमदार पावसाने रोहे शहर व ग्रामीण भागाला झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले होते. त्यातच रोहे तालुक्यातील चणेराजवळील खंदार आदिवासीवाडीतील एक घर जमीनदोस्त झाले. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. यातील महिला गंभीर जखमी असल्याने तिला अधिक उपचारासाठी अलिबाग जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महसूल खात्याची टीम तब्बल १५ तासांनंतर घटनास्थळी पोहचली. सरकारी आरोग्य यंत्रणेकडून जखमी व्यक्तींची अवहेलना आणि महसूल खात्याच्या सुस्तपणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली होती. रोहे तालुक्यातील चणेराजवळील सारसोली ग्रामपंचायत हद्दीतील खंदार आदिवासीवाडी येथे आदिवासी बांधवांची ६० ते ७० घरे असून येथे दीडशेहून अधिक लोकसंख्या आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वा. कोसळणाऱ्या दमदार पावसात येथील संदीप सहादेव वाघमारे (३५) हे पत्नी मंगला संदीप वाघमारे (३०) व मुलगी संजना संदीप वाघमारे, मुलगा संजय संदीप वाघमारे हे घरात बसले होते, त्यावेळी अचानक घर कोसळले. संपूर्ण घर या चौघांवर कोसळल्याने ते जखमी झाले. वाडीवर घर कोसळण्याचे दृश्य बघताच शेजारील आदिवासी बांधवांनी धाव घेत तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या वाघमारे कुटुंबीयांना बाहेर काढले. विशेष म्हणजे घटना घडण्यापूर्वी या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या दुर्दैवी घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मंगला संदीप वाघमारे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना प्रथमोपचारासाठी कोकबन आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टर उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे गंभीर जखमी असून देखील जखमी महिला उपचारापासून वंचित राहिली. पावसाच्या सुरुवातीलाच शासकीय आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले अशी प्रतिक्रि या अनेकांनी दिली. घर पडून गंभीर जखमी झालेल्या या विवाहित महिलेवर किंचितही उपचार न करता तिला घरी पाठविण्यात आले. तसेच रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याचे सांगण्यात आले.तब्बल १५ तास या महिलेला उपचाराकरिता ताटकळत थांबावे लागले. तद्नंतर जखमी वाघमारे कुटुंबीयांना उपचाराकरिता अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती गंभीर असल्याने जखमी महिलेला मुंबईत हलविण्याचे आदेश जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले असे समजते. घटनेनंतर तातडीने सरपंच संतोष भौड, हसमुख जैन, सदस्य रवींद्र वाघमारे, संतोष पोेळेकर, रवी वाघमारे, ग्रामसेवक दीपक वारंगे आदिंनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचाराकरिता रूग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)>पंचनामा करण्याचे आदेशया घटनेची माहिती रोहा तहसील कार्यालयाला १४ तासांनंतर समजली, तर तब्बल १५ तासांनंतर तहसीलदार दीपक गायकवाड आपत्कालीन व्यवस्था पथकासमवेत घटनास्थळी पोहचले. अपघाताविषयी प्रशासनाला उशिरा माहिती मिळाली. त्यामुळे नुकसानग्रस्त व जखमी वाघमारे कुटुंबीयांपर्यंत सरकारी यंत्रणा उशिरा पोहचली अशी कबुली तहसीलदार गायकवाड यांनी दिली. नुकसानग्रस्त वाघमारे कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीतजास्त मदत मिळावी याकरिता आपण जातीने लक्ष घालणार अशी प्रतिक्रि या तहसीलदार गायकवाड यांनी व्यक्त केली तर घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश मंडल अधिकारी व तलाठी यांना दिला आहे, असे ते म्हणाले. तब्बल १५ तास या महिलेला उपचाराकरिता ताटकळत थांबावे लागले. जखमी वाघमारे कुटुंबीयांना उपचाराकरिता अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती गंभीर असल्याने जखमी महिलेला मुंबईत हलविण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.>तळा येथे रस्ता झाला जलमयशहरातील मांदाड रस्त्यावरील रातवडकर वाडा ते देवीचा चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे बांधलेली नसल्यामुळे गेले चार दिवस पडत असलेल्या जोरदार पावसाने रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे.मे महिन्याच्या अखेरीस या मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव यांनी भरण्याचे काम केले. परंतु एकाच बाजूला असणारे गटार मात्र साफ केले नाही, ते कचऱ्याने तुडुंब भरलेले होते. जोरदार पडलेल्या पावसामुळे गटारातून पाणी जाण्यास मार्ग नसल्यामुळे हे पाणी रस्त्यावर आले आणि रस्ता जलमय झाला. या रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून वाहन चालकांना वाहन घेवून जाणे मुश्कील झाले आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. >घरांसह गोठ्यांचे नुकसानअलिबाग : रायगड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी घर, गोठे यांचे नुकसान झाले आहे, तर तीन जनावरे मृत झाली. सोमवारी गोरेगाव येथे एक झाड पडल्याने दोघे जखमी झाले आहेत. प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.तळा येथे तीन जनावरांना प्राण गमवावा लागला. खालापुरात दोन, तर माणगावात एका घराचे नुकसान झाले. अलिबागमध्ये एका कच्च्या घरालाही फटका बसला आहे.
रोह्यात घर पडले
By admin | Updated: June 28, 2016 02:30 IST