ऑनलाइन लोकमत
पेठ (नाशिक), दि. 11- कालपासून कोसळणारा संततधार पाऊस सोमवारी दिवसभर सुरूच राहिल्याने तीन दिवसापासून सुर्यदर्शन झाले नसून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीत कोहोर भागात सर्वाधिक पाऊस पडला असून 209 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पेठ -187.5, तर जोगमोडी परिसरात 169 मिमी पाऊस कोसळला आहे. यामूळे तालुक्यातील धरणांच्या पातळीत झापाट्याने वाढ होत असून नद्यानाले ओसंडून वाहत आहेत. रविवारी संगमेश्वर, खंबाळे, हातरूंडी, अंबापूर, निरगूडे, कोहोरकडे जाणाऱ्या फरशी पूलावरून पूराचे पाणी वेगाने वाहत असल्याने तीन चार तास वाहने अडकून पडली होती. तर भुवन घाटात दगडमातीचा भराव खचल्याने काही काळ वाहतूक खोळंबल्याचे सांगण्यात आले.शेतीची कामे ठप्प
तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतीचे कामेही ठप्प झाली असून भातशेतीच्या खाचरांचे ( आवण) तलाव झाल्याने औत फिरवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामूळे शेतकरी या पावसाने सुखावला असला तरीही मशागतीस ऊशीर होत असल्याने पाऊस कमी होण्याची प्रतिक्षा आहे. पेठ तालुक्यातील दमणगंगा सह लहान मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत असून तीव्र उतार व डोंगरदयामूळे गुजरात राज्याकडे मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.