साश्रू नयनांनी भक्तगणांनी दिला निरोप : अंतिम दर्शनासाठी देशभरातून आले नागरिकनागपूर : गुजराती समाजाचे श्रद्धास्थान व मानवसेवेचे आदर्श असलेले श्रद्धेय संत हरिराम बाप्पा यांच्यावर सोमवारी सायंकाळी कळमेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘छोटे जलाराम बाप्पा’ म्हणून भक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या बाप्पांच्या अंतिम दर्शनासाठी देशाच्या निरनिराळ्या कोपऱ्यातून हजारो भक्त पोहोचले होते. कळमेश्वर येथील एमआयडीसी परिसरातील त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेवर अंत्यसंस्कार झाले. साश्रू नयनांनी भक्तगणांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.८० वर्षांचे हरिराम बाप्पा यांचे रविवारी गुजरातमधील राजकोट येथील अमरेली या गावी निधन झाले. त्यांची गुजरात जरी जन्मभूमी असली तरी नागपूर शहर त्यांची कर्मभूमी होती. त्यामुळे येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी रात्री उशिरा विमानाने त्यांचे पार्थिव नागपूरला आणले. यावेळी मोठ्या प्रमाणावर त्यांचे भक्त विमानतळावर उपस्थित होते.सोमवारी सकाळच्या सुमारास इतवारीतील ‘गणेश निवास’ या निवासस्थानाहून त्यांचे पार्थिव क्वेटा कॉलनी येथील संत जलाराम मंदिर परिसरात नेण्यात आले. तेथील प्रार्थना भवनाच्या सभागृहात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. सकाळपासूनच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांची रीघ लागली होती. दुपारी ४ च्या सुमारास कळमेश्वरच्या दिशेने अंत्ययात्रा निघाली. त्याअगोदर वैकुंठरथावरून मध्य नागपुरातील सतरंजीपुरा, धान्यबाजार, नेहरू पुतळा, मस्कासाथ, टांगास्टॅण्ड, सिटी पोस्ट आॅफिस, वल्लभाचार्य चौक या मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दिवसभरात सुमारे १७ हजार नागरिकांनी बाप्पांचे अंत्यदर्शन घेतले. कळमेश्वरला अंतिम संस्कारासाठी सुमारे आठ हजार नागरिक पोहोचले होते. बाप्पांच्या पार्थिवाला त्यांचे पुतणे घनश्याम ठकराल यांचा नातू हरिहर ठकराल याने मुखाग्नी दिला. पं. योगेशभाई जोशी यांच्या पौरोहित्यात विधिविधानासह १५ पंडितांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारणासह अंतिमसंस्कार पार पडले. त्यानंतर परिसरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेशहरिराम बाप्पा यांच्या अंत्यदर्शनासाठी शहरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. महापौर प्रवीण दटके यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश त्यांनी यावेळी वाचून दाखविला. बाप्पा हे संत होते अन् त्यांनी समाजाला नेहमीच प्रेरणा दिली, असा शोकसंदेश मुख्यमंत्र्यांनी पाठविला होता. महापौरांनी नागपूर मनपातर्फे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. हरिराम बाप्पा यांच्या निवासस्थानी नागरिकांची गर्दी झाली होती. हरिनाम पाठ आणि कीर्तनहरिराम बाप्पा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुजरातमधील जसदण या त्यांच्या जन्मगावाहून मोठ्या प्रमाणावर लोक आले होते. शेकडो महिला आणि पुरुष भक्तांनी हरिनाम पाठ आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली. हरिराम बाप्पांच्या प्रेरणेतून ज्या गरीब व वंचित लोकांना भोजनदान होते, त्यांनीदेखील त्यांचे अंत्यदर्शन घेऊन साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.दुकाने बंद ठेवून श्रद्धांजलीइतवारीतील अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून हरिराम बाप्पा यांना श्रद्धांजली अर्पण केली. सराफा बाजार, धान्यबाजार येथील दुकानांचा यात समावेश होता. शिवाय बाप्पांची अंत्ययात्रा ज्या मार्गावरून गेली तेथील व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकानांचे शटर खाली केले.
हरिराम बाप्पा अनंतात विलीन
By admin | Updated: December 30, 2014 00:58 IST