पुणे : नाशिक रेशनिंग धान्य घोटाळ््यातील तब्बल १८२ क्विंटल धान्य उदरांनी खाल्ले असेल, म्हणूनच या प्रकरणात दोषी आढळलेल्या तहसीलदारांच्या निलंबनास महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) स्थगिती दिली असावी, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत या निर्णयाला शासनाच्या वतीने न्यायालयात आव्हान देणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. तेथे तब्बल १८२ क्विंटल म्हणजे तब्बल सात कोटी रुपयांच्या धान्याचा काळाबाजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणात सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान रेशनिंग धान्य घोटाळ््यातसहभागी असलेल्या सात तहसीलदारांना निलंबित केले. परंतु मॅटने सातही तहसीलदारांच्या निलंबनास स्थगिती देऊन सात दिवसांच्या आता पुन्हा पूर्वीच्याच पदांवर रुजू करून घेण्याचे आदेश दिले. मॅटच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करीत गिरीश बापट यांनी या निर्णयावर शासनाच्या वतीने वरील न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘मॅट’च्या निर्णयाला शासन आव्हान देणार - गिरीश बापट
By admin | Updated: June 20, 2015 00:22 IST