वरिष्ठ नक्षलवाद्यांकडून अनन्वित छळ : गोपीने सांगितली आपबितीगडचिरोली : नक्षल चळवळीतील १५ वर्षांत अनेक हिंसक कारवाया करून नक्षल्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या दलम कमांडर गोपीला वरिष्ठ नक्षल्यांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्याच्यावर संशय व्यक्त केला जात होता. कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील पोलीस चकमकीत त्याची प्रेयसी शामको ही ठार झाली. या घटनांमुळे त्रस्त गोपीने ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असल्याची माहिती गोपीने पोलिसांना दिली. गडचिरोली, गोंदियासह छत्तीसगडच्या सीमा भागात मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या गोपी ऊर्फ निरंगसाय मडावी या जहाल नक्षलवाद्याने कुरखेडा तालुक्यातील सावरगावजवळच्या जंगलात एका सहकाऱ्याच्या माध्यमातून पोलिसांसमोर ११ नोव्हेंबर रोजी आत्मसमर्पण केले. गोपी हा मूळचा कोरची तालुक्यातील असून २००२ मध्ये त्याने नक्षल चळवळीत प्रवेश केला. सुरूवातीला दलम सदस्य म्हणून काम करताना त्याने हळूहळू वरिष्ठ नक्षलवाद्यांचा विश्वास संपादन केला. हिंसक कारवायांमध्ये निपुण आणि दिलेली जबाबदारी न चुकता पार पाडीत असल्याने त्याला दलम कमांडर म्हणून बढती देण्यात आली. एवढेच नव्हे, तर तो विभागीय समितीचा सदस्यसुद्धा होता. दरम्यान, गोपीची शामको ऊर्फ शांता कोरचा रा. तोडसापेढा ता. एटापल्ली हिच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. शामकोच्या प्रेमात पडलेल्या गोपीचे चळवळीतील कारवायांवर लक्ष लागेनासे झाले. याची माहिती वरिष्ठ नक्षलवाद्यांना मिळाली. गोपीवर पाळत ठेवण्यास सुरूवात झाली. त्याचे एकेकाळचे सहकारी असलेले नक्षली त्याच्यावर संशय घेऊ लागले.नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य व महाराष्ट्राचा सचिव मिलिंद तेलतुंबडे याने गडचिरोली-गोंदिया डिव्हीजनचा डिव्हीजनल कमांडर पहाळसिंग याला २८ जून २०१३ रोजी पत्र लिहून गोपी व शामकोच्या प्रकरणाची माहिती दिली. हे पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. गोपी व शामकोला एकत्र ठेवू नये, गोपीला नक्षल कारवायांसाठी पुन्हा सक्षम करणे आवश्यक आहे. त्याला एकट्याला कारवाईवर पाठवू नका, त्याच्यावर विशेष नजर ठेवा, असे पत्रात म्हटले आहे. पत्रानुसार गोपी व शामकोला वेगवेगळे ठेवण्यात आले. वरिष्ठांच्या या कृतीमुळे गोपी व शामको दोघांच्याही मनात नक्षल चळवळीविषयी प्रचंड संताप निर्माण झाला होता. त्यातच १७ फेब्रुवारी २०१४ रोजी गडचिरोली-गोंदिया सीमेवर असलेल्या कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील पोलीस चकमकीत शामको ठार झाली. यामुळे गोपी पूर्णपणे हतबल झाला. एकीकडे जीवापाड प्रेम करणारी प्रेयसी गेली आणि दुसरीकडे वरिष्ठांकडून त्रास देण्याचे प्रकार वाढीस लागले.
गोपीला प्रेयसी गमविल्याचे दु:ख
By admin | Updated: November 16, 2014 00:43 IST