नाशिक : विद्यमान सरकारच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असल्याने काही तरी चुका होणारच, परंतु अशा चुकांमधून मार्ग काढून चांगल्यात चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न सरकार करेल व आगामी बारा वर्षांनंतरच्या कुंभमेळ्याचे नियोजन हा कुंभ संपताच दुसऱ्या दिवसापासून केले जाईल, अशी घोषणा करून आत्तापासूनच नियोजन केल्यास आगामी कुंभमेळ्यात गोदावरीचे स्वच्छ व निर्मळ दर्शन निश्चित घडेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. विद्यमान सरकारला कुंभमेळ्याची तयारी करण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी मिळाल्यामुळे काही तक्रारी वा नाराजी असू शकते; परंतु अशाही परिस्थितीत नियोजनात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी राज्यातील अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांवरच त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियोजनासाठी राज्य सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत साधू-महंतांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी, यासाठी आपण स्वतंत्र कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
पुढच्या सिंहस्थात गोदावरीचे शुद्धीकरण!
By admin | Updated: February 22, 2015 01:33 IST