हवामान बदलते आहे, ते लहरी होते आहे. अशा स्थितीत आपल्या पिकाची पद्धतही बदलायला हवी. पीकपाणीही अधिक नैसर्गिक व्हायला हवे. तसे अनेक प्रयोग आपल्या सभोवती सुरू आहेत. त्यांचा वेध घेतानाच मिळालेला पुन्हा निसर्गाची कास धरण्याचा संदेश...देशात अन्नसुरक्षा कायदा अमलात आला आहे. या कायद्याची जशी गरज होती, तशीच गरज होती, सुरक्षित अन्नासाठीही कायदा करण्याची. देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढत असले तरी खतांच्या वाढत्या वापराचा शरीरावर होणारा परिणाम पाहता सेंद्रिय खतांचा वापर करून नैसर्गिकरीत्या उत्पादन घेतलेल्या अन्नपदार्थांची मागणी वाढते आहे. पुन्हा निसर्गाकडे जाण्याचा संदेश स्वीकारला जातो आहे. ही गरज लक्षात घेऊन उत्पादन पद्धतीत बदलांची गरज भासते आहे. ती लक्षात घेऊन अंबरनाथ तालुका आणि नेरळसारख्या ग्रामीण भागात नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचाही ओढा वाढतो आहे. येथील शेतकऱ्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला आहे आणि वेगवेगळे प्रयोग करत तसे उत्पादन घेण्यासही सुरुवात केली आहे. अन्नधान्य उत्पादनाची पारंपरिक पद्धत म्हणजे नैसर्गिक शेती. रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा-नैसर्गिक साधनांचा वापर करून त्यावर फुलवलेली शेती. मात्र, कस न पाहता अधिक उत्पादन घेण्याच्या स्पर्धेमुळे ना पिकाचा दर्जा टिकून राहतो, ना धान्याचा. वरवर वाटले तरी या पद्धतीत उत्पादन कमीकमी होत जाते, हेही शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. ७० च्या दशकात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर अधिक धान्य पिकवण्याच्या स्पर्धेत सेंद्रिय खतांना पर्याय म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढला. जास्तीतजास्त उत्पादन घेऊ न धान्यसाठा वाढवण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला. धान्य मिळवण्यास प्राधान्य देत देशभरात शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचा पर्याय निवडला. त्यामुळे देशात अन्नधान्यांचे उत्पादन कैकपटीने वाढले. शेतकरी स्थिरावला. मात्र, या रासायनिक खतांपासून तयार झालेले अन्नपदार्थ हळूहळू मानवी शरीरावर विपरित परिणाम करत असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर रासायनिक शेतीमुळे जमिनीचा कसदेखील घटत गेला. यावर कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी अभ्यासासोबत संशोधनही सुरू केले. रासायनिक शेतीला पर्यायी शेती म्हणजे सेंद्रिय खतांंचा वापर करून केलेली नैसर्गिक शेती. (संकलन-शब्दांकन : पंकज पाटील)भाज्या, मसाल्यांचे प्रयोगपूर्वी फळभाज्यांचे उत्पादन घेताना दोन रोपट्यांमध्ये अंतर जास्त ठेवावे लागत होते. आता त्या पद्धतीत बदल घडवत कमी अंतर ठेवून हायब्रीड आणि कलम केलेल्या रोपट्यांचा वापर करून फळांचे आणि भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते. हवामानातील आर्द्रतेचा विचार करता आपल्या कोकणपट्ट्यात काही नावीन्यपूर्ण उत्पादने घेण्याचे, प्रयोगांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. काळी मिरी, लवंग, दालचिनी, बडीशोप आणि जिरे यांचेदेखील उत्पादन यशस्वीरीत्या घेतले जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. कोकणपट्ट्यात वेलचीचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न याआधी करण्यात आला. मात्र, बदलत्या हवामानात वेलचीचे उत्पादन नफा मिळेल इतके नसते. तसेच उत्पादनाचा दर्जाही कमी राहतो. त्यामुळे वेलचीचे उत्पादन कमी घेतले जाते. हाच प्रकार मिरचीच्या बाबतीत घडतो. मिरचीचे उत्पादन होत असले, तरी खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने त्याकडे शेतकरी वळत नाहीत. >आरोग्यदायी शेती आधुनिकतेकडे वाटचाल करणारा माणूस हा स्वत:च्या शरीराबाबत, आरोग्याबाबत- एकूणच हेल्थ कॉन्शस झाला. आर्थिक सुबत्ता आलेल्यांना रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांपासून केलेल्या अन्नपदार्थांची गरज भासू लागली. त्या गरजेतूनच पुन्हा शेतकरी मूळ नैसर्गिक शेतीकडे वळला आहे.सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करताना उत्पादन कमी येणार, याची जाणीव असल्याने यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. कमीतकमी जागेत जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरीही नवनवीन पर्यात शोधू लागले. नैसर्गिक शेतीतून उत्पादन घेतलेल्या अन्नपदार्थांना बाजारात चांगला भाव मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी केवळ नैसर्गिक शेतीचाच पर्याय निवडला. >हायड्रोफोनिक भाजीपाला उत्पादनाचा प्रयत्न वांगणी परिसरात स्वत:ची शेती नसतानाही दुसऱ्याची शेती भाडेतत्त्वावर घेऊन शेतीचे धाडस केले. हल्ली शेतकरी शेतीपासून दुरावत असताना आम्ही वांगणी आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांकडून शेती भाड्याने घेतली. तेथे वेगवेगळे प्रयोग सुरू केले. शेतीची आवड असल्याने शेतीत संशोधन केले. जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोेफोनिक तंत्राचा वापर सुरू केला. आता त्याच तंत्राचा वापर करून भाजीपाल्याचे उत्पादन कसे घेता येईल, यावर अभ्यास सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी होताच कमी वेळेत जास्त भाजीपाल्यांचे उत्पादन घेणे शक्य होईल. तसेच शेती करताना कीटकनाशकांचा कमीतकमी वापर करून शेती फुलवण्यात यश मिळवले. फळांचे उत्पादन घेताना मोठमोठ्या मॉलमध्येही फळे पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले. त्यात्या फळांवर नैसर्गिकरीत्या मॉलचे नाव कोरण्याचा प्रयोग यशस्वीदेखील झाला आहे. कल्ािंगडावर मॉलचे नाव टाकून ते त्यात्या मॉलमध्ये पाठवण्यात येते. हा प्रयोग देशपातळीवरील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी स्वीकारला. शेतीत नवनवे प्रयोग केल्यास हे क्षेत्रही चांगले उत्पन्न देणारे साधन ठरू शकते, हे आम्ही दाखवून दिले. - गणेश देशमुख, कृतिशील शेतकरी, वांगणीफ्लोअर फार्मिंग : यात अनेकदा लहरी हवामानामुळे जाणवू लागली पाण्याची चणचण. त्यामुळे कमीतकमी पाण्यावर ठिबक सिंचनसारख्या तंत्राचा वापर करून शेती कशी फुलवता येईल, याचाही अभ्यास सुरू आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही सिमेंटचे जंगल उभे राहते आहे. त्यामुळे शेतीसाठी जागा अपुरी पडत आहे. त्याला पर्याय म्हणून कमी जागेत मजले तयार करून (फ्लोअर फार्म) उत्पादन घेतले जात आहे. सूर्यप्रकाश आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यावर ही शेतीदेखील यशस्वी होताना दिसते आहे. नेरळच्या सगुणा बाग या कृषी पर्यटन केंद्राचे सर्वेसर्वा चंद्रशेखर भडसावळे, वांगणी येथील अभ्यासू शेतकरी गणेश देशमुख आणि बदलापूर-बेंडशीळ येथील राजेंद्र भट यासारख्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेण्याची किमया साध्य केली. तसेच शेतीतील बदलत्या स्वरूपावर अभ्यास केला. मार्गदर्शन सुरू केले. >एसआरटी पद्धतीमुळे आधुनिक स्वरूपरायगड जिल्ह्यातील माथेरानच्या पायथ्याशी नेरळला आम्ही शेतीतील अनेक प्रयोग केले. कृषी पर्यटन हाही त्याचाच एक भाग. पर्यटनाबरोबरच विविध प्रयोगांतून ५० एकर जागेत शेतीच्या पाच प्रवृत्ती तयार केल्या. या ठिकाणी जमिनीची मशागत न करता भाताचे पीक घेण्याचे एसआरटी हे नवे तंत्रज्ञान शोधले. या पद्धतीत जमिनीची नांगरणी न करता किंवा पारंपरिक पद्धतीत जसे पाणी अडवून चिखल केला जातो, तसे न करता भातशेती केली जाते. महत्त्वाचे म्हणजे पीक घेतल्यावर ते मुळापासून कापून न काढता पिकांची मुळे ही जमिनीतच फवारणीद्वारे कुजवली जातात. त्यामुळे जमिनीचा कस आपोआपच वाढतो आणि पुढेही दर्जेदार पीक येते. या प्रणालीचा वापर आता देशात २४ ठिकाणी होतो आहे. सध्या ‘पुसा सुगंध पाच’ या जातीचे भातपीक घेतले आहे. सगुणा बागेच्या २५ एकरांत वर्षाकाठी ५० टन भाताचे पीक घेतले जाते. हाच तांदूळ कृषी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी वापरला जातो. ईशान्य भारतात पिकवल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाच्या ‘गोविंद भोग’ या जातीचा भातही आम्ही पिकवला आहे. हा भात आता केंद्राचे आकर्षण ठरतो आहे. मसाले, भाज्या यांच्या लागवडीत नवनवीन प्रयोग करून आम्ही नैसर्गिक शेतीला बळकटी देत आहे. प्रयोग यशस्वी झाला की, परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही त्याची माहिती देऊन उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. शेतीतील हे प्रयोग पाहण्यासाठी जसे शेतकरी, पर्यटक येतात तसेच अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठातील विद्यार्थीही येतात. - चंद्रशेखर भडसावळे, सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्र, नेरळ
चला निसर्गाकडे!
By admin | Updated: October 18, 2016 03:59 IST