मुंबई : राहुल गांधी गरीबी हटावची घोषणा करताहेत. याआधी त्यांच्या आजीबार्इंनी याची सुरूवात केली होती. त्यांची गरीबी हटली, पण लोकांची नाही. काँग्रेस देशद्रोहाचे कलम हटवू पाहत आहे. हाच मोठा देशद्रोह आहे. हे कलम काढल्यास दाऊद येऊन काँग्रेसचा नेता बनेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी महालक्ष्मी रेसकोर्सजवळ आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशद्रोह्यांना गोंजारणारे, क्रांतीकारकांना कायर म्हणणाऱ्यांच्या हाती देश देऊ नका. मी अमित शहांचा अर्ज भरायला गेलो, तर माझ्यावर टीका झाली. राष्ट्रवादीवाले म्हणतात, तुम्ही यांच्या शामियानात कसे? त्यांच्या पोटात का दुखतय? अरे याच तंबूत तुम्ही आधी झाडलोट करायला गेला होता, असा सवालही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्घव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारसभेत पहिल्यांदाच औसा येथे मंगळवारी एकत्र आले. ठाकरे म्हणाले, भाजपने केलेला जाहीरनामा वाचून आनंद झाला. कलम ३७०, राममंदिर आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. युती होण्याचे हेच कारण आहे.काँग्रेसचा जाहीरनामा मात्र थापा आहेत. राहुल यांच्या आजींपासून गरिबी हटावचा नारा सुरु आहे. त्यांची गरिबी हटली मात्र लोकांचे कायझाले, अशी टीका ठाकरे यांनी केली.